मुंबई : वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यावर उपस्थित नसतानाही वैयक्तीक फायद्यासाठी दोन व्यक्तींमधील आर्थिक वाद हाताळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ते सर्वजण खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. आदेशानुसार, तक्रारदार मुफ्ती नसीमुद्दीन सुखानु शेख व मेहूल मेहता ऊर्फ शफी सूर्या यांच्यात आर्थिक व्यवहारांबाबत वाद आहेत.
त्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसपाळीला कर्तव्यावर नसतानाही ते प्रकरण हाताळले, असा आरोप आहे. त्याबाबत प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्या संदर्भात अहवालही प्राप्त झाला होता. त्यानंतर तिघांनाही सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच तिघांनाही देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
दोन व्यक्तींमध्ये आर्थिक वाद परस्पर सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली असता तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून ती सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.