महाराष्ट्रात आपल्या सत्ताकाळात रस्ते बांधणीसाठी ‘टोलपर्वा’चा पाया रचणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने आता कोल्हापूरमधील टोलवसुलीच्या निमित्ताने राज्यभर खदखदत असलेल्या लोकक्षोभाच्या आगीत सत्तेची पोळी भाजण्यासाठी आगामी निवडणुकीनंतर सत्ता आली तर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा मंगळवारी केली. त्याचबरोबर वीजदरकपातीवरून ‘आप’ला यश मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील वीजदर ५० टक्क्यांनी कमी करण्याची मागणीही सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना, भाजप, रिपाई आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीची जागावाटपाची पहिली बैठक मंगळवारी झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनी टोलविरोधी सूर लावला. रस्त्यांचा खर्च वसूल झाला तरी टोलवसुली करून जनतेची लूट केली जात आहे. महायुती सत्तेवर येताच राज्य टोलमुक्त करू, अशी घोषणा मुंडे यांनी केली. त्याचबरोबर वीजदर कपातीच्या घोषणेमुळे ‘आप’ला राजकीय यश मिळाल्याने युतीच्या नेत्यांनीही वीजदर कपातीच्या विषयाला हात घातला. विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी करावेत आणि शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
जागावाटप मुद्यावर खेचाखेची करण्यासाठी नव्हे तर, आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेट्टी, जानकर यांचा विशिष्ट मतदारसंघांसाठी आग्रह आहे. आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा पुन्हा जाहीरपणे बोलून दाखविली. त्याचा संदर्भ देत आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी या नेत्यांना दिले.
३० जानेवारीला महामेळावा
आघाडी सरकारच्या विरोधात महायुती ताकदीनिशी लढणार आहे. ३० जानेवारीला महायुतीचा महामेळावा होणार असून त्यात ‘१०० दिवसांत महागाई कमी करू’ आणि ‘भारत भ्रष्टाचार मुक्त करू’ अशी आश्वासने असलेल्या यूपीएच्या जाहीरनाम्याची होळी करणार आहोत, असे मुंडे यांनी सांगितले. सरकारच्या विरोधात २५ फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे.