मुंबई : वर्षांनुवर्षे ज्या स्थानकात रेल्वेगाडय़ांना थांबा देण्याची मागणी, तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण करू न शकणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासन आता स्थानकांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्याची घोषणा केली आहे. शिर्डी, सोलापूर वंदे भारतला अनुक्रमे कल्याण आणि ठाण्याला थांबा देण्यात आला आहे तर, आता महत्त्वाच्या रेल्वे गाडय़ांना कर्जत, रोहा, पनवेल, लोणावळा येथे पुढील सहा महिन्यांसाठी थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेमध्ये अनेक प्रवासीभिमुख सेवा वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यापासून भारतीय रेल्वेमध्ये नाविन्यपूर्ण बदल होण्यास सुरुवात झाली असून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. यात अमृत भारत स्थानक विकास योजनाह्ण, भारतीय रेल्वेतील ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी प्रवास करणाऱ्या रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवासभाडय़ात २५ टक्क्यांची कपात, सामान्य रेल्वेडब्यांतील प्रवाशांना जनआहार योजनेद्वारे २० आणि ५० रुपयांना जेवण देण्यात येत आहे. आता रेल्वेगाडय़ांच्या थांब्यात वाढ करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून प्रवासी, प्रवासी संघटना काही थांब्यांची मागणी करत होते. तेथे सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वेने मुंबई - शिर्डी आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला अनुक्रमे कल्याण आणि ठाण्याला थांबा दिला आहे. आता मुंबई-पुणे दोन्ही दिशेकडील डेक्कन एक्स्प्रेसला आणि हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला शुक्रवारपासून कर्जत येथे थांबा देण्यात येणार आहे. दादर-पंढरपूर एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्सप्रेस, एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस या चार रेल्वेगाडय़ांना दोन्ही दिशेकडे आणि एक दिशेकडील कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस लोणावळा येथे शुक्रवारपासून थांबवण्यात येईल. दोन्ही दिशेकडील एलटीटी-एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेसला शुक्रवारपासून पनवेल येथे थांबा दिला जाणार आहे.