मुंबई : गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज सपशेल चुकले होते. बिहारमध्येही निम्मे अंदाज चुकले होते. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांमधील गुरुवारच्या निकालांची सर्वाना उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानंतर राजकीय वर्तुळात हे अंदाज खरे ठरतील का याची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच यंत्रणांचे अंदाज सपशेल चुकले होते. काही चाचण्यांमध्ये भाजपला सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर काही जणांनी ममता बॅनर्जी यांना काठावरचे बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २९४ पैकी २१३ जागा मिळाल्या. २०११ आणि २०१६ पेक्षा ममतांच्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या होत्या. ममतांची तेव्हा लाट होती, पण एकाही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला २०० जागांचा टप्पा गाठला जाईल, असा अंदाज वर्तविला नव्हता. भाजपला सत्ता मिळेल, असा एक अंदाज होता. तर काही संस्थांनी भाजपला १०० ते १५० जागांचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात भाजपला ७७ जागाच मिळाल्या. बंगालमध्ये सारे अंदाज सपशेल चुकले होते. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. एकाही संस्थेने भाजपला एवढय़ा जागांचा अंदाज वर्तविला नव्हता. २०२० मध्ये बिहारमध्ये अंदाज चुकले होते. टाईम्स नाऊ - तृणमूल काँग्रेस - १५८, भाजप - ११५ रिपब्लिक टीव्ही - तृणमूुल काँग्रेस - १४३, भाजप - १३३ इंडिया टुडे - भाजप - १४७, तृणमूल काँग्रेस - १४३ पी मार्क - तृणमूुल - १५८, भाजप - १२० ईटीजी रिसर्च - तृणमूल - १६९, भाजप - ११० जन की बात - भाजप - १७४, तृणमूल - ११२ एबीपी - तृणमूल - १५८, भाजप - ११५ याप्रमाणे अंदाज होते.