मुंबई : मुंबई शहर, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. धरणांमध्ये सोमवारी ८.६० टक्के असलेला पाणीसाठा मंगळवारी ९.७८ टक्के झाला आहे. खालावलेल्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झाल्यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
यंदा पाऊस लवकर आला असला तरी धरणक्षेत्रात पावसाने जोर धरला नव्हता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालवतच होता. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस वाट पाहून राखीव साठ्याचा वापर करायचा की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांत मिळून १ लाख ४१ हजार ५११ दशलक्ष लीटर म्हणजेच ९. ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे.
पाणीसाठा खालावत असल्यामुळे मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र पाठवून उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी केली होती. धरणक्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने उर्ध्व वैतरणा धरणातील पाणीसाठा वापरण्यास सुरूवात केली. मात्र सोमवारी चांगला पाऊस झाल्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा पाणीसाठ्याचा आढावा घेऊन राखीव साठ्याच्या वापराबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्यावर्षीही उन्हाळ्यात राखीव साठ्याचा वापर करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. तशीच वेळ यंदाही आली. मात्र येत्या काही दिवसात पावसाने जोर धरला तर राखीव साठा वापरावा लागणार नाही. रविवारी धरणक्षेत्रात अगदीच तुरळक पाऊस पडला.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा – ६. ०३ टक्के
मोडक सागर – २७. १६ टक्के
तानसा – ९. ६९ टक्के
मध्य वैतरणा – ११.६१टक्के
भातसा – ६.०९ टक्के
विहार – ३५. ७४ टक्के
तुळशी – ३३. ६७ टक्के एकूण – ९. ७८ टक्के