मुंबई: आजाराकडे जाणारे सर्व महामार्ग हे पोटातून जातात, हे सर्वांनाच माहित असूनही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामागे आहाराच्या चुकीच्या सवयी, जंक फुडचे मोठ्या प्रमाणात होणारे सेवन तसेच अनावश्यक जागरणापासून काही कारणे आहेत. दरवर्षी २९ मे हा दिवस ‘जागतिक पचनसंस्था आरोग्य दिवस’ म्हणून साजरा करताना यकृत ( लिव्हर ) आरोग्य, पचनाशी संबंधित आतील जैवविविधता म्हणजेच मायक्रोबायोम विज्ञान, मोठ्या आतड्याचा कॅन्सर प्रतिबंध (कोलोरेक्टल कर्करोग प्रतिबंध), लठ्ठपणा आणि पोषण यासारख्या विशिष्ट पचनाशी संबंधित आरोग्य या थीमवर जागतिक पतनसंस्था महासभा (वर्ल्ड गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी ऑर्गनायझेशन) संघटनेने लक्ष केंद्रित केले आहे.
ॲसिडीटी किंवा वैद्यकीय भाषेत ‘जीइआरडी’ या आजाराचे प्रमाण भारतात दिवसेंदिवस वाढत चालले असून दक्षिण भारतात हे प्रमाण २२% इतके असल्याचे काही संशोधकांनी नमूद केले आहे. आयबीएस किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आरोग्य यंत्रणेवर अधिक भार टाकणारा आणि केवळ राहणीमानाशी संबंधित असणारा आजार भारतात ४.२ टक्के लोकांमध्ये दिसून येतो. आतड्यांचा कॅन्सर हा देखील वाढत असून नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री च्या अहवालानुसार १९८२- २०१० या काळात मोठ्या आतड्याचा कॅन्सर ०.९-५.८ टक्के तर रेक्टम म्हणजे गुदाशयाचा कॅन्सर २.७-९.८ टक्के इतका वाढला आहे,असे नांदेड येथील पचनसंस्थविकारा तज्ज्ञ डॉ नितीन जोशी यांनी सांगितले.
इनफ्लेमेटरी बॉवेल डिसीज ( आयबीडी) ज्यात प्रामुख्याने अल्सरेटिव कोलायटीस आणि क्रोन्स डिसीज या आजारांचा समावेश होतो त्याच्ये प्रमाण भारत देशात झालेल्या संशोधनानुसार साधारणपणे दर १ लाख लोकसंख्येमागे ४३ -४५ रुग्ण असे आहे. खरी आकडेवारी मिळणे कठीण आहे. परंतु हे दोन्ही आजार गंभीर स्वरूपाचे असून त्यांचे उपचार सामान्य रुग्णांना न परवडणारे आहेत. कारण या आजारांचे उपचार जीवनभर चालू राहतात.
आपला देश खूप मोठा आणि जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असणारा आहे. यात पाश्चिमात्य देशांप्रमाणे संशोधनात्मक अभ्यासाचा अभाव सार्वत्रिक असल्याने नेमकी आकडेवारी मिळणे अवघड असल्याचे डॉ नितीन जोशी यांचे म्हणणे आहे.२९ मे १९५८ रोजी ‘जागतिक पचनसंस्था महासभेची’स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ २००५ मध्ये जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ऑर्गनायझेशनने “जागतिक पचनसंस्था आरोग्य दिन” सुरू केला. ही मोहीम पचनसंस्थेच्या आरोग्याला प्रोत्साहन देते आणि त्यासंबंधित आजारांबद्दल जागरूकता पसरविणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देते असेही डॉ जोशी म्हणाले.
जगभरातील जवळपास ४० टक्के लोकांना पचनसंस्थेच्या वेगवेगळ्या आजारांनी आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर विळखा घातलेला पाहताना दिसून येत आहे. ‘आजाराकडे जाणारे सर्व महामार्ग हे पोटातून जातात’ हे आता सर्वश्रुत आहेच. वैश्विक स्तरावर विकासाने जी गती पकडली आहे, त्यात जगण्याची गतीही तितक्याच पटीने वाढलेली असताना निसर्गाने निर्माण केलेल्या पचनाची गती मात्र वाढण्याचे कोणतेही प्रावधान नाही हे आजचा माणूस विसरत चालल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हैदराबाद येथे अलीकडेच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय पचन संस्था विकार तज्ञांच्या परिषदे’त “अल्सरेटिव्ह कोलाइटिस इन २०३०’ या विषयावरच्या डॉ. मायकल कॅम, ऑस्ट्रेलिया या जगतविख्यात पचनसंस्था विकार तज्ज्ञाच्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीतून आपल्या देशात उपलब्ध असलेल्या आणि बाजारात मिळणाऱ्या ‘अल्ट्रा प्रोसेस्ड फुड’ म्हणजेच ‘खाण्यास तयार असलेल्या अन्नपदार्थांमध्ये पावरण्यात येणारी एक हजार केमिकल्स जी अन्न साठविण्यासाठी, चव वाढविण्यासाठी तसेच रंग आणण्यासाठी वापरले जातात. यांपैकी जवळजवळ ७० केमिकल्स हे कॅन्सरकारक असल्याचे डॉ नितीन जोशी यांनी सांगितले.आपल्या देशात गेल्या दोन दशकात पचनसंस्थांचे आजार फार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहेत. उदाहरणार्थ लठ्ठपणा, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि कॅन्सर. याचे मुख्य कारण म्हणजे आपण काय खातो तसेच आपल्या शरीराची गरज काय आहे याकडे लोकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येते.
‘आपलं पोट आपल्या हातात’ हे विसरून आजचा माणूस आपलं पोट कंपनीत होणाऱ्या अन्नपदार्थांकडे सोपवून बसला आहे. सुपरमार्केटमध्ये मिळणारे सर्वच रेडिमेड अन्नपदार्थ म्हणजेच अगदीच तयार पराठे आणि चपात्यांपासून टीव्हीवर दर पाच मिनिटांनी दाखवले जाणारे बिस्किट,चॉकलेट्स, चिप्स, वेफर्स आईस्क्रीम्स ,डबा बंद गुलाबजामुन, रसगुल्ले आणि सर्व प्रकारच्या मिठाया हे खरे तर पचनाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे ठाण्यातील डॉ पराग देशपांडे यांनी सांगितले. खाण्यापिण्याच्या सवयींबाबत आपण जागरूक राहिलो तर अधिक चांगले व निरोगी आयुश्य जगता येईल असेही डॉ. देशपांडे म्हणाले.
भारत सरकारद्वारा मागच्या काही वर्षांमध्ये ‘श्री अन्न’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. ‘श्री अन्न’ हे दुसरे तिसरे काही नसून शेतातून येणारे धान्य उदाहरणात राळा, नाचणी किंवा नागली, बाजरी किंवा सजगुरे इत्यादींसारखे भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असणारे अन्न आहे. पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांनी हे अन्न घेणे जवळजवळ बंदच करून टाकले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केमिकल वापरायची सवय आपल्या नसानसांमध्ये आता भिनली आहे. शेतीच्या प्रत्येक कामासाठी म्हणजे धान्य पेरण्यापासून ते उगवण्यापर्यंत आणि साठवण्यापासून ते पोटात टाकण्यापर्यंत आपण केमिकल युक्त अन्न खात आहोत. याचमुळे यावर्षी ‘जागतिक पचनसंस्था आरोग्य संघटने’ने (नरिश टू फ्लरीश) हा म्हणजेच आपल्या “भरभरासाठी पोषण” हा मुद्दा घेऊन त्यावर काम करण्याचे वर्षभर ठरविले आहे.