मुंबई : मुंबईत वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. गृहनिर्माण कामे, वाढती विकासात्मक कामे आणि वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अखत्यारीतील असलेल्या ठिकाणी पाण्याची फवारणी, पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहने वापरण्याऐवजी विद्युत वाहनांचा ताफा वाढवणे आणि धूळ व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच २ हजार स्थानिक प्रजातींची झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळचे संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांनी जूहू येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात २ हजार स्थानिक प्रजातींची झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. तसेच २०३० वर्षापर्यंत संपूर्ण भारतभरात १० कोटी झाडे लावण्याचा अदानी समूहाने उपक्रम हाती घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच्या परिसरातील वीज वापर कमी करून, सौरऊर्जा व पर्यायी हरित उर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन १०० टक्के कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धावपट्टीजवळ रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम बसवून, पीएम १०, पीएम २.५ आणि इतर प्रदूषकांची नोंदणी केली जात आहे. याद्वारे धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासह कचऱ्यांचे व्यवस्थापन करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून, त्याचा वापर विविध कामांसाठी करण्यात येत आहे.
भारतातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळापैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर्यावरणपूरक अनेक कामे केली जात आहेत. भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रात पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीसाठी विविध सुविधांचा अमल केला जात आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.