नऊ महिन्यांत एकाही ‘एअरबस’चा पत्ता नाही

एअर इंडियातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका मिहान-सेझमध्ये अतिशय गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विमान देखभाल दुरुस्ती केंद्राला (एमआरओ) बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मान्यता देऊन सुमारे नऊ महिन्यांचा काळ लोटला तरी ‘एअरबस’ मालिकेतील एकही विमान देखभाल-दुरुस्तीसाठी नागपुरात दाखल होऊ शकले नाही. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला वेग दिल्याचा दावा फोल ठरला आहे.

डीजीसीएने मिहान-सेझमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये एअरबस ३१९, ३२० आणि ३२१ या विमानांची तपासणी करण्यास मान्यता ऑक्टोबर २०१६ दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात एअरबस ए ३२० हे विमान देखभाल-दुरुस्तीसाठी नागपुरात आणले. त्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यामुळे एअर इंडियाच्या अत्याधुनिक एमआरओचा क्षमतेनुसार उपयोग होईल आणि नागपूर विमानतळावर

विमानांची रेलचेल वाढेल, असे वाटत होते. परंतु एअर इंडियात मनुष्यबळाचा अभाव आणि मुंबई सोडून नागपूरच्या एमआरओमध्ये काम करण्यास कर्मचारी तयार नसल्याने गेल्या नऊ महिन्यांत एअरबसचे एकही विमान देखभाल दुरुस्तीसाठी नागपुरात उतरले नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिहान-सेझ प्रकल्पाला गती देण्याचा एक भाग म्हणून एमआरओ पूर्णपणे संचालित करण्यात येईल. त्यासाठी एअरबसमुळे हा प्रकल्प गतिमान होईल आणि युवकांना रोजगार मिळाले, असा दावा केला होता. बोईंग कंपनीने एमआरओ उभारले आणि एअर इंडियाकडे हस्तांतरित केले. एमआरओ ५० एकर जागेवर आहे. १०० मीटर बाय १०० मीटरचे दोन हँकर आहेत. याला संचालित करण्यासाठी १८४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. येथे सध्या केवळ २५ ते ३० नियमित कर्मचारी नियुक्त आहेत.

एअर इंडियाला एमआरओ चालवणे अवघड असल्याने ते खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी निविदा देखील काढण्यात आली.

त्यात खासगी कंपन्यांनी रूची दाखवली नव्हती. त्यानंतर एमआरओ खासगी करण्याचा विचार सोडून देण्यात आला. बोईंगसोबत विमानांची देखभाल-दुरुस्ती करून या एमआरओचा उपयोग करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु मनुष्यबळ नसल्याने मिहानमधील एअर इंडिया एमआरओ अजूनतरी पांढरा हत्ती ठरला आहे.

‘नागपुरातील एमआरओ ‘एअरबस’ या विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्यास सज्ज आहे. बोईंगच्या देखभाल दुरुस्तीत उपलब्ध कर्मचारी व्यस्त आहे. त्यापासून त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे एअरबसची देखभाल-दुरुस्ती कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर करता येणे शक्य आहे.’

– सुनील अरोरा, उपमहाव्यवस्थापक, एअर इंडिया.