गुणवत्तापूर्ण कामासाठी हातभार नागपूर मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची व्हावी म्हणून देशभरातील मेट्रो रेल्वेचे तसेच भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले जात आहे. अलीकडेच नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेच्या रूपात आता विदेशातील या क्षेत्रातील काही तंत्रज्ञ कंपन्यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाला मिळणार आहे. देशात तीन प्रकारच्या मेट्रो रेल्वे आहेत. जमिनीवरून धावणारी, खांबांवरून धावणारी आणि भूमिगत धावणारी, नागपुरात धावणारी मेट्रो ही अंशत: खांबांवरून आणि जास्तीतजास्त जमिनीवरून धावणारी आहे. या कामासाठी आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन हे सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सामान्यपणे घेतले जाते. प्रत्यक्षात या नियुक्तीची प्रक्रिया नागपूरमध्ये रखडल्याने या तीनही क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी तंत्रज्ञांच्या चमूची आवश्यकता नागपूर मेट्रोसाठी होती. दिल्ली, मुंबई आणि कोचीन येथे मेट्रो रेल्वे धावू लागली आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे सहकार्य या प्रकल्पासाठी आवश्यक होते. ते मिळवण्यात नागपूर मेट्रो रेल्वेला यश आल्यानेच सल्लागार कंपनी नियुक्तीच्या पूर्वीच मेट्रोच्या कामाने गती घेतली. या तीनही मेट्रोचे अनेक अधिकारी सध्या नागपूर मेट्रोसाठी काम करीत असून या शिवाय भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या शाखेत काम करणारे अधिकारी तसेच बीएसएनएल आणि मेट्रोचे काम करणाऱ्या नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. त्यात संजय सिंह हे रेल्वेची सहयोगी कंपनी इरकॉनमधून आले आहेत. कार्यकारी संचालक एस. रामनाथ हे बहुराष्ट्रीय कंपनी गोल्डन स्कॉटमधून आले आहेत. आशीष कुमार शर्मा (डीजीएम) हे बीएसएनएलमधून आले आहेत. आता मेट्रोसाठी भारत, अमेरिका आणि फ्रान्समधील एकूण चार कंपन्यांचा समूह असलेल्या कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आल्याने तांत्रिक मार्गदर्शनाची मेट्रोची बाजू आणखी भक्कम झाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची मुहूर्तमेढ आघाडी सरकारच्या काळात झाली असली तरी त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले त्यावेळी इतर प्रकल्पाप्रमाणे याही प्रकल्पाची गत होईल, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होती, कारण त्याला लागणारा प्रचंड खर्च हे त्या मागचे प्रमुख कारण होते. ८ हजार ६०० पेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प उभारताना त्यासाठी लागणारी सरकारी आणि खासगी जमिनीचाही प्रश्नही प्रमुख अडथळा निर्माण करणारा होता. मात्र, गत दोन वर्षांत विदेशी बँकेच्या (जर्मन बँक) कर्जासह ७० टक्के जमीन हस्तांतरणाचा प्रश्नही निकाली निघाल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. एक वर्षांत मेट्रोच्या बांधकामाच्या क्षेत्रातील निम्मे काम पूर्ण झाले आहे. खापरीजवळ जमिनीवरून धावणाऱ्या एक किलोमीटर मार्गाचे काम रूळ टाकण्यापर्यंत पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन सल्लागार कंपनीच्या माध्यमातून घेतले जाते. परंतु सल्लागार नियुक्त करण्यास विलंब झाल्याने देशभरातील इतर मेट्रोच्या तंत्रज्ञांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्प वेळेत आणि निर्धारित खर्चात पूर्ण करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता भासते. देशात सध्या बंगळुरू, कोचीन आणि दिल्ली येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यरत असून ते देशातील वेगवेगळ्या भागात आहेत. तेथील अधिकाऱ्यांना या क्षेत्रातील सर्वच पातळीवरील कामाचा अनुभव आहे. त्याचा फायदा या प्रकल्पाला होणार आहे. प्रकल्पाचे काम जागतिक दर्जाचे होण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते. सध्या मेट्रोकडे असणारी तंत्रज्ञाच्या चमूमध्ये मेट्रोच्या कामाचा अनुभव असणारे बहुतांश अधिकारी आहेत. त्यामळे ‘टीम मेट्रो’ ही तांत्रिकदृष्टय़ा मजबूत झाली आहे. एस. एम. आपटे (उपमहाव्यवस्थापक-जनसंपर्क) विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ * प्रमुख अधिकारी पूर्वानुभव * ब्रीजेश दीक्षित (एम.डी) मध्य रेल्वे * सुशीलकुमार माथुर (संचालक) भारतीय रेल्वे * एस.पी. त्रिपाठी (प्रकल्प व्यवस्थापक) दक्षिण-पूर्व रेल्वे * जनककुमार (प्रकल्प व्यवस्थापक) मध्य रेल्वे * जवाहर साळुंखे (उपमहाव्यवस्थापक) कोकण रेल्वे * रत्नेश बरियार (सरव्यवस्थापक) दिल्ली मेट्रो * सतीश चौरासिया (उप महाव्यवस्थापक) दिल्ली मेट्रो * महेशकुमार (प्रकल्प संचालक) कोचीन मेट्रो * एम,आर. पाटील (प्रकल्प संचालक) दिल्ली मेट्रो/ कोकण रेल्वे * अभिजित मंडल दिल्ली मेट्रो * आशीषकुमार (उपमहाव्यवस्थापक) बंगळुरू मेट्रो * देवेंद्र रामटेकेकर (प्रकल्प संचालक) बंगळुरू मेट्रो * विकास सिंघल (उपहाव्यवस्थापक) बंगळुरू मेट्रो * विश्वास रंजन (उपमहाव्यवस्थापक) मुंबई मेट्रो,