चंद्रपूर: घुग्घुस येथे भुस्खलनामुळे बाधित १६९ कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

घुग्घुस गावात झालेल्या भूस्खलनात घरे गमावलेल्या बाधित १६९ कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड कशा पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येईल याबाबतची आढावा बैठक विधानभवनात महसूल मंत्री विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला वन तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह संबधीत अधिकारी बाधित गावचे गावकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा >>>आर्णी येथील सराफा व्यवसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार यांनी यावेळी घुग्घुस गावात भुस्खलनामुळे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी या बैठकीत अनेक प्रशासकीय सूचना केल्या. त्यावर साधक बाधक चर्चा होऊन महसूल विभागाने प्रस्तावित केलेली जमिन भूस्खलन बाधितांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे घुघ्घुस येथील भूस्खलनग्रस्त बाधितांना घरकुलांसाठी जमिनीचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कालबद्ध प्रक्रियेतून या जमिनी बाधितांच्या घरकुलांसाठी आता उपलब्ध होतील.