नागपूर: सर्वसामान्यांकडून निवृत्तीनंतर मिळालेला अथवा इतर मार्गाने कमावलेला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेची निवड केली जाते. परंतु नागपुरातील हजारो नागरिकांकडून इंदोरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेला पैसा अडचणीत आला आहे. या संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात गेला काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणात इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष आणि २० संचालकांसह एकूण २१ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लेखापरीक्षक नारायण गाढेकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली गेली आहे. लेखापरीक्षकाच्या अहवालानुसार, २०१९ ते २०२३ या काळात इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेकडून सामान्य नागरिकांकडून एफडी आणि बचत योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. परंतु ही रक्कम नियमांनुसार गुंतवणूकदारांना परत करण्यात आली नाही.
दरम्यान या प्रकरणात नागरिकांकडून तक्रार करण्यात आली. त्यानंतर सदर पतसंस्थेत घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यानुसार घोटाळ्यात सहभागी असलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत आणि संचालक मंडळातील इतर २० सदस्यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी एजंटांच्या मदतीने नागरिकांचा विश्वास जिंकला आणि त्यांच्याकडून पैसे जमा केले आणि नंतर ती रक्कम संस्थेऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी वापरली गेली. गुंतवणूकदारांना वेळेवर रक्कम न मिळाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर घोटाळ्याचा प्रकार पुढे आला.
घटनेचा असा झाला उलगडा.
इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यानंतर विशेष लेखापरीक्षकांनी संस्थेची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीत इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. त्यानंतर लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलिसांनी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील कायदेशीर प्रक्रिया जलद करण्यात येणार आहे.
गुंतवणूक दारांची मागणी काय?
इंदोरा येथील उत्थान नागरी सहकारी पत संस्थेतील घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांनी प्रशासनाकडे सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांचे जमा केलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.