चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले आहे. २०२२ पूर्वीच्या ओबीसी लोकसंख्येच्या(भाटीया रिपोर्ट) आधारावर निवडणूका घ्या असे सांगायला न्यायालयाला तीन वर्ष लागली. त्यामुळे आम्ही विविध पदापासून वंचित राहिलो. आमचे तीन वर्ष नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर या जिल्ह्यात एक जिल्हा परिषद, एक महापालिका, दहा नगर परिषद आणि सहा नगर पंचायतच्या निवडणुकीचा ज्वर लवकरच चढणार आहे.

मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक राज होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासक राज जाणार आणि लोकांनी निवडणून दिलेले लोकप्रतिनिधी पून्हा मतदानाच्या माध्यमातून विराजमान होणार अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रीय चंद्रपूर जिल्हा शहर कॉग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी यांनी ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करतांना सप्टेंबर महिन्यापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहिर करावा हे न्यायालयाचे स्प्ष्ट आदेश म्हणजे जनतेच्या मताधिकाराचा सन्मान आहे.

हा निर्णय लोकशाहीची पूनस्थापना आणि जनतेच्या हक्काचा विजय आहे. कॉग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी कटीबध्द आहे असे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतांना निवडणुकीसाठी तयार असल्याचा संदेश दिला आहे. शिवसेना शिंदे व ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार व शरदचंद्र पवार तसेच मनसे, वंचित बहुजन आघाडी,बसप, रिपाई व आपच्या नेत्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या जिल्ह्यात एक जिल्हा परिषद, चंद्रपूर महापालिका, भद्रावती, चिमूर, वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, नागभीड, घुग्घुस, ब्रम्हपुरी व गडचांदूर या दहा नगर परिषद आणि गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, सावली व सिंदेवाही या सहा नगर पंचायत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण १८ संस्थेत निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान २०२२ च्या लोकसंख्येच्या आधारावरच निवडणुका घ्याव्या असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. हाच निर्णय तीन वर्षापूर्वी सुध्दा देता आला असता. या प्रकारामुळे आम्ही नगरसेवक पदापासून वंचित राहिलो. आमचे तीन वर्ष नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेची आठ वर्षानंतर निवडणूक

चंद्रपूर महापालिकेत एकूण १७ प्रभाग व ६६ नगरसेवक आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती. तेव्हा पक्षीय बलाबल भाजप व मित्र पक्षाचे एकूण ४३ नगरसेवक होते. कॉग्रेस १२, बहुजन समाज पार्टी ६, शहर विकास आघाडी ४ व कलावती यादव या एका नगरसेविकेचे नगरसेवक पद रद्द झाले होते. दरम्यान आता महापालिकेची आठ वर्षानंतर निवडणूक होईल.

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ मध्ये संपला. जिल्हा परिषदेत एकूण ५८ सदस्य होते. घुग्घुस नगर परिषदेची स्थापना झाल्याने तेथील जिल्हा परिषद सदस्य नितू चौधरी यांचे सदस्य पद रद्द झाले होते. तर अन्य एका जिल्हा परिषद सदस्याचा मृत्यू झाला होता. पक्षीय बलाबल बघितले तर भाजपाचे ३३ सदस्य होते. कॉग्रेस २० व ३ अपक्ष सदस्य होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्णयाचे मनापासून स्वागत

अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. तसेच आयोगाच्या २०२२ च्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मा. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तसेच जिल्ह्य़ातील जनतेच्या वतीने आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.