अकोला : ‘म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात आला. अहमदाबाद विमानतळावरून ‘टेकऑफ’ केलेले विमान इमारतीवर कोसळले. या इमारतीमध्ये असलेली अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीतून ऐश्वर्याने ब्लँकेट गुंडाळून स्वतःचा जीव मोठ्या धाडसाने वाचवला. या अपघातामुळे ऐश्वर्याला मोठा धक्का बसला. अंगावर शहारे आणणारा भयावह अनुभव आला असून तो जीवनात कधीही विसरू शकणार नाही, असे ऐश्वर्या तोष्णीवाल हिने सांगितले.
गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जूनला झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला. यात विमानातील २४१ प्रवासी तर विमान कोसळलेल्या भागातील २४ जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघात प्रकरणामुळे भारतासह संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान, अकोल्यातील एका विद्यार्थिनीचे दैव बलवत्तर म्हणून ती विमान अपघातातून बचावली. शहरातील दुर्गा चौक येथील रहिवासी ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकते. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत आहे. ऐश्वर्या एक दिवस अगोदरच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली.
अहमदाबाद विमानतळावरून आकाशात झेपावलेले विमान काही अंतरावर जाऊन एका इमारतीवर कोसळले. या अपघाताच्यावेळी इमारतीतील वसतिगृहात अनेक विद्यार्थी होते. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ऐश्वर्या तोष्णीवाल झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. सर्वत्र आवाज, आगीचे लोळ अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीपुढे खचून न जाता ऐश्वर्याने धीराने तोंड दिले. आगीमुळे कुठलीही ईजा होऊ नये म्हणून ऐश्वर्याने स्वतः भोवती ब्लँकेट गुंडाळले. प्रचंड दाटलेल्या धुरातून वाट काढत तिने स्वतःचा जीव वाचवला. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. स्वतःचा जीव वाचवल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने आपले वडील अमोल तोष्णीवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मुलीने घडलेली संपूर्ण माहिती सांगताच कुटुंब हादरून गेले. देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावल्याची भावना तोष्णीवाल कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.