अकोला : उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात चढत असतांनाच जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी जोरदारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यापासून अंशत: दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले. विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा देखील ओलांडला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात अंशत: घट झाली. ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अकोल्यात तापमानाचे नवनवे विक्रम रचले जातात. ती परंपरा यंदाही कायम आहे. मार्च महिन्यांपासून शहरातील तापमानात मोठी वाढ नोंदवल्या गेली. शहरातील या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा लागल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला. शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये बुधवारी दुपारी वादळी वारा सुटला होता. त्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शहराच्या विविध भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला.

दरम्यान, नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यात १४ व १५ मे दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवेचा वेग ताशी ३० ते ४० किमी प्रति तास राहील. वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली थांबू नये, पाऊस व विजेचा कडकडाट होत असतांना भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दामिनी’तून कळणार वीज कुठे पडणार

दामिनी ॲपवर सात मिनिटे, १४ मिनिटे आणि २१ मिनिटे आधी वीज पडण्याची सूचना दिली जाते. त्या सूचना पाहून स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी ॲपचा वापर केला जाऊ शकता. हे ॲप पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत विकसित करण्यात आले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.