अकोला : लोकसभा निवडणुकीची कधी नव्हे ती उत्सुकता मतदारसंघात बघायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारात उमेदवारांकडून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतजोडणीवर भर आहे. यंदा लोकसभेच्या प्रचारादरम्यान समाजातील विविध घटकांच्या गठ्ठा मतपेढीला एकत्रित करून जेवणावळी उठवल्या जात आहेत.

मतदारसंघातील अनेक मुद्द्यांवर ऊहापोह केला जातो.निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय चर्चाचे फड रंगत आहेत. यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक प्रचाराचे तंत्र बदल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!

अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचार मोहिमेने जोर पकडला. १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परंपरेनुसार तिहेरी लढत आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी बाजी मारली. यंदा दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणे अटळ आहे. उमेदवारांनी देखील हे गृहीत धरल्याने त्यानुसार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.

मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडेल, तर त्याचा कुठल्या उमेदवारांना फटका बसेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गठ्ठा मतदान अधिकाधिक आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांची जोरदार प्रयत्न आहेत. त्यामधूनच विविध समाजाचे मेळावे घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये पूर्वी जाहीर सभांवर जोर राहत होता. आता मात्र मेळाव्यांच्या माध्यमातून थेट मतदारांना साद घातली जात आहे. या मेळाव्यांमध्ये जेवणावळी देखील ठेवल्या जात आहेत.

हेही वाचा…राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग न्यायालय म्हणाले…

त्यामुळे मतदारांचा देखील त्याला प्रतिसाद मिळतो. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवारांनी ही मोर्चेबांधणी केली. भाजपचे अनुप धोत्रे यांनी विकासात्मक मुद्दे, केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांमधून मिळालेला लाभ आपल्या प्रचाराच्या केंद्रबिंदू ठेवला. सोबतच भाजपने अभियंता, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, व्यापारी आदींचे एकत्रित मेळावे घेऊन गठ्ठा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. डॉ. अभय पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याअगोदरपासूनच संवाद मेळावे सुरू केले.

यामाध्यमातून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यावर त्यांचा कल आहे. ग्रामीण भागात दौरे करून देखील त्यांनी मोर्चेबांधणी केली. अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा विविध समाजांना एकत्रित करून सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग यशस्वी केला. त्याच प्रयोगातून लोकसभेत देखील यश मिळवण्याचे ॲड. आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. विविध लहान-मोठ्या समाजाच्या मतपेढीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात दौरे करून नागरिकांच्या भेटीगाठी व कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. आता मतदानात त्याचा किती प्रभाव पडतो, हे येणारा काळच स्पष्ट करू शकेल.

हेही वाचा…वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा

लढतीच्या लाभावरून तर्कवितर्क

अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा वंचितला गेल्या साडेतीन दशकात यश मिळवता आलेले नाही. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. त्रिकोणी लढतीचा नेहमी भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे. यावेळेस देखील तिरंगी लढत असून ती कुणासाठी फायदेशीर ठरेल, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.