लोकसत्ता टीम

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा ते पांढरीला जोडणाऱ्या एकमात्र नवीन पुलाचे बांधकाम गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत पर्यायी रस्त्यावर चिखल साचल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींसह अन्य नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते.

कधी कोण घसरून पडेल, याचा नेम नाही. काही किरकोळ अपघात देखील या ठिकाणीं घडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पांढरी गावात मुख्य बाजारपेठ व रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे हे गाव परिसरातील ३० ते ३२ गावांचे केंद्रस्थान आहे. या मार्गावर नेहमीच प्रवाशांची तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची वर्दळ असते. उन्हाळ्यात पूल बांधकामाची सुरवातच उशिरा झाल्याने आता पावसाळ्यातदेखील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा यामुळे बांधकाम संथगतीने होत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती

सध्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी पुलावर मुरूमाऐवजी भीस वापरण्यात आली. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, येणाऱ्या-जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील विद्यार्थी व वाहनचालकांनी केली आहे.

आणखी वाचा- अवैध खनिज उत्खनन व वाहतूकबाबत जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

जून महिन्यांपर्यंत हा पूल रहदारीसाठी खुला व्हायला पाहिजे होता. पण सुरवातीपासूनच पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने आतापर्यंत बांधकाम अपूर्ण आहे. पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी मी संबंधित विभागाला सूचविले आहे. -सुधा रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा नवीन पूल डुंडा गावच्या नागरिकांसाठी तसेच परिसरातील गावांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. सुरवातीपासूनच कंत्राटदाराचे या पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष आहे. पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. -उज्ज्वला हटवार, सरपंच, डुंडा.