अमरावती : मेळघाटातील चिखलदरा आणि परिसर सध्या पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी चिंब झाला असून, निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने तो अधिकच बहरला आहे. मेळघाटात खोल दऱ्यांमध्ये दाटलेले पांढरेशुभ्र धुके आणि सर्वत्र पसरलेली मनमोहक हिरवळ डोळ्यांना एक वेगळाच आनंद देत आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे येथील वातावरण अत्यंत आल्हाददायक बनले आहे.
झाडे आणि वेलींवर चमकणारे पावसाचे थेंब, दाट धुक्याची चादर यामुळे जणू काही ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो आहे. या धुक्यातून वाट काढताना पर्यटक एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा अनुभव घेत आहेत.
निसर्गाच्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने चिखलदऱ्यात गर्दी करीत आहेत. पावसाळी वातावरणात मेळघाटातून प्रवास करताना मिळणारा अनुभव अविस्मरणीय असल्याचे पर्यटक सांगत आहेत. या निसर्गरम्य वातावरणातील क्षण कॅमेरात कैद करीत आहेत.
सध्या विदर्भात मोसमी पावसाचे आगमन झालेले नसले, तरी या पूर्वमोसमी पावसाने मेळघाट परिसराला संजीवनी दिली आहे. उन्हाळ्याच्या काहिलीनंतर पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पावसाळ्यापुर्वीच घाटात असे आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने आगामी पावसाळ्यात मेळघाटाचे सौंदर्य आणखी किती बहरेल, याची उत्सुकता स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना लागली आहे. निसर्गाच्या या अप्रितिम रुपाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक दमदार पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.
एरवी मे महिना हा अत्यंत उकाड्याचा असतो. थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे पर्यटक गारव्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. पण, गेल्या काही वर्षांत चिखलदरा येथेही उष्णता वाढल्याचे पर्यटक सांगतात. पण, यंदा मेच्या अखेरीस निसर्गाची वेगळी किमया पर्यटक अनुभवत आहेत.
चिखलदरा पर्यटनस्थळासह परिसरात रविवारी दुपारी दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी पांढरे शुभ्र दाट धुके पसरले होते. त्यामुळे शनिवार, रविवार नजीकचे पर्यटनस्थळ म्हणून आलेल्या पर्यटकांना आल्हाददायी वातावरण अनुभवता आले. सिपना नदी सेमाडोह परिसरातून वाहते. त्या भागासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण निसर्गसंपन्न झाले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागात यंदा सर्वाधिक प्रमाणात आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणनेत मचानीवर कुठल्याच प्रकारच्या सुविधा वन्यप्रेमींना उपलब्ध झाल्या नाहीत. कोसळलेला मुसळधार पाऊस जंगलातील आग रोखण्यास योग्य ठरला असून खळखळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.