अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातून पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढलेली संख्या बघता पंढरपूर येथून भाविकांना परत आणण्यासाठी मिरज-नागपूर या ८ जुलै रोजी आणखी एका अतिरिक्त फेरीची सुविधा मध्य रेल्वेने दिली आहे.
गाडी क्र. ०१२१३ एकेरी विशेष गाडी ही ८ जुलै रोजी मीरज येथून दु. १२.५५ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे दु. १२.२५ वाजता पोहोचेल. दरम्यान ही गाडी पंढरपूर येथे दु. ३.५५ वाजता तर बडनेरा येथे सकाळी ८.५० वाजता पोहोचेल. मार्गात ती पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, पुलगाव, वर्धा, अजनी या स्थानकांवर थांबा घेणार आहे. या गाडीची दोन वातानुकुलीत तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, दोन द्वितीय श्रेणी अशी संरचना आहे.
पंढरपूरला जाण्यास गाडी क्र. ०१२०५ नागपूर-मिरज रेल्वेची सुविधा देखील उपलब्ध आहे. ही विशेष रेल्वे ४ व ५ जुलै रोजी बडनेराहून दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुटणार आहे. गाडी क्र. ०१२०६ मिरज-नागपूरने ५ व ६ जुलै रोजी परतीचा प्रवास करता येणार आहे. ही विशेष रेल्वे पंढरपूर स्थानकावर थांबा घेणार आहे, असे कळवण्यात आले आहे.
नवी अमरावती रेल्वेस्थानकावरूनही गाडी
आषाढी एकादशीनिमित्त अमरावतीकर भाविकांना विठू माउलींचे दर्शन घेता यावे यासाठी नवी अमरावती रेल्वे स्थानक ते पंढरपूर विशेष रेल्वेची सुविधा दिली आहे. दोन फेऱ्या भाविकांना पंढरपूर येथे नेण्यासाठी तर दोन फेऱ्या पंढरपूरहून परत आणण्यासाठी अशा एकूण चार फेऱ्या ही विशेष रेल्वे करणार आहे. गाडी क्र. ०१११९ पंढरपूर विशेष रेल्वे नवी अमरावतीहून २ व ५ जुलै रोजी दु. २.४० वाजता वारकऱ्यांना घेऊन निघेल. त्यानंतर १८ तास ३० मिनिटांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०११२० ही पंढरपूरहून ३ व ६ जुलै रोजी सायं. ७.३० वाजता निघेल व नवी अमरावतीत दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. दोन तृतीय वातानुकुलित, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामान्य द्वितीय श्रेणी केवळ बैठक आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी या विशेष रेल्वेची संरचना आहे.