शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळाची तीव्रता समजण्याची कवूत असलेला एकही मंत्री राज्य मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे राज्यातील मूळ मुद्दय़ांवर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकार ‘भारत मात की जय’ यासारखे मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित करीत आहे, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केला.
मराठवाडय़ात भीषण दुष्काळ असून शेतकरी अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगत आहे. ग्रामीण भागातील लोक पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. शहरात झोपडपट्टय़ा वाढत आहेत. सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे या मूळ मुद्दय़ांवर चर्चा होणार होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक इतर मुद्दे उपस्थित केले जात आहेत. समस्यांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे भाजपकडून ‘पॉलिटिक्स ऑफ डिफ्लेकशन’ केले जात आहे.
आम्ही जयहिंद, जय महाराष्ट्र, जय भारत म्हणू, याबाबत काहीही समस्या नाही. ते म्हण्यासाठी जबरदस्ती नको. मुख्यमंत्र्यांनी भारत माता की जय न म्हणणाऱ्यांनी देशात राहू नये, हे वक्तव्य त्यांनी स्वतहून म्हटले की, त्यांच्याकडून कुणी वदवून घेतले हे बघावे लागेल, असा टोलाही कदम यांनी हाणला.