अकोला : खारपाणपट्ट्यातील खाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल यांच्या पुढाकाराने म्हातोडी गावात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवून प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले.

पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खारपाणपट्टा आहे. या पट्ट्यातील भूगर्भात खारे पाणी, तसेच माती क्षारयुक्त असल्याने भूपृष्ठावर संचयित केलेल्या पाण्यात क्षार मिसळून पाणी खारट होते. या नैसर्गिक समस्यांमुळे परिसरातील नागरिकांना गोड्या पाण्याची समस्या कायम भेडसावत असते.

हेही वाचा – अमरावतीत दिसला ‘तपकीरी छातीचा माशीमार’ पक्षी

आतापर्यंत यावर अनेक उपाययोजना व प्रयाेग करण्यात आले. आता आणखी एक प्रयोग केला जाणार आहे. भूगर्भशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनात खारपाणपट्ट्यातील म्हातोडी गावातील सरकारी जमिनीवर गोड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पथदर्शी प्रकल्प राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पथदर्शी प्रकल्पासाठी खानापूरकर यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक असलेले सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणानुसार आवश्यक असलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करावा लागेल.

प्रकल्पावर नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत खर्चाचा ताळमेळ बसण्यास अडचण उद्भवल्यास राज्य शासनाच्या इतर योजनांच्या अभिसरणाद्वारे निधीची उपलब्धता करून घेण्यात येईल. हा पथदर्शी प्रकल्प आगामी मान्सूनपूर्व पूर्ण करण्याचे नियोजन व त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. खारपाणपट्ट्यात नाविन्यपूर्ण बंधारे प्रायोगिक तत्त्वावर घेण्यासाठी तत्काळ विशेष बाब म्हणून प्रस्तावास मान्यता द्यावी व निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आ. सावरकर व आ. खंडेलवाल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. एका गावातील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा उपक्रम अन्य गावांमध्ये राबवण्यात येणार आहे.

हेही वाचा – मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पाच्या सुवर्ण महोत्‍सवी कार्यक्रमावर निषेधाचे सावट, सत्‍तारूढ गटातील आमदारच करणार आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खारपाणपट्ट्यात पाण्याची मोठी समस्या आहे. खाऱ्या पाण्यामुळे असंख्य नागरिक किडणी आजाराने ग्रस्त आहेत. नियोजित प्रकल्प यशस्वी झाल्यास खारपाणपट्ट्यातील सुमारे ८९४ गावांना गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील बहुतांश समस्या सुटतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.