अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आपली शेतीच्या विषयावर आणि थोडी राजकारणावरही चर्चा झाली. पण सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत आपण कोणत्याही आघाडीसोबत जाणार नाही, हे आपण आधीच स्पष्ट केले आहे. सध्या आकाशात ढगच आलेले नाहीत, त्यामुळे आताच सारे काही सांगणे शक्य नाही, असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
शरद पवार यांनी गुरुवारी आमदार कडू यांच्या कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी भेट दिली. चहापानादरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. याविषयी माहिती देताना कडू म्हणाले, शरद पवार यांच्यासोबत फारशी राजकीय चर्चा झाली नाही. शेतीच्या विषयावर आम्ही बोललो. पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व्हायला हवीत, याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आपण त्यांना सांगितले. या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील मतदार संघाविषयी आपण माहिती दिली.
हेही वाचा >>>काँग्रेसचे आज ‘शक्तिप्रदर्शन’; सोनिया गांधी, राहुल, खरगेंसह तीन व्यासपीठांवर पाचशेहून अधिक नेत्यांची उपस्थिती
राजकीय चर्चेबद्दल विचारले असता, बच्चू कडू म्हणाले, महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत आपण महायुतीसोबत राहू, असे आधीच आपण स्पष्ट केले आहे. पुढील काळात काय घडामोडी होतात, हे आताच सांगता येणार नाही. सर्वच राजकीय बाबी उघड करायच्या नसतात.