नागपूर : रेल्वेत खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधांचे प्रमाण वाढत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे ‘आयआरसीटीसी’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लांबच्या प्रवासात रेल्वेगाडी किंवा रेल्वेस्थानकावर उपलब्ध खाद्य घेऊन प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी रेल्वेने या खाद्यपदार्थांबाबत अतिशय सतर्क असणे आवश्यक आहे. परंतु रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरून प्रवाशांच्या कायमच तक्रारी असतात.

आता तर शिळे किंवा दूषित अन्न प्रवाशांना विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या महिन्यात नागपूर स्थानकावरून खरेदी केलेले अन्न खाल्ल्यामुळे ७० हून अधिक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाची चौकशी रेल्वेच्या वाणिज्य विभाग आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन केली. यामध्ये आयआरटीसीने खाद्यपदार्थ विक्रीचे (जनआहार) कंत्राट दिलेल्या व्यक्तीने शिळ्या अन्नाची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयआरसीटीसीने कंत्राटदाराचा स्टॉल दीड महिना बंद केला आणि नंतर पुन्हा त्याला खाद्यपदार्थ विक्रीची मुभा दिली. अन्नातून विषबाधा होणे अतिशय गंभीर बाब असताना अशाप्रकारे कंत्राटदाराला पुन्हा संधी दिली गेली. यावर भारतीय प्रवासी यात्री केंद्राने आक्षेप घेतला आहे. केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंडळ (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार केली असून कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा-बंदूकीची एक गोळी आणि कायमचे अपंगत्व.. काय घडले ?

गेल्या महिन्यात यशवंतपूर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर नागपूर विभागात अवैध खाद्यदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. कारवाई देखील करण्यात आली. परंतु धक्कादायक बाब म्हणजे ज्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना विषबाधा झाली त्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून खाद्यपदार्थ खरेदी केल्याची बाब समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्नातून विषबाधा झाल्याची बाब समोर आल्यानंतर चौकशी करण्यात आली. आयआरसीटीकडून जनआहार स्टॉल दीड महिना बंद ठेवण्यात आला. तसेच दंडात्मक कारवाईही करण्यात आली. -अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.