नागपूर : मुंबईकरांनो.…! बिबट तुमच्या नाही, तर आमच्या शहरात अधिक आहेत. बिबट्यांच्या बाबतीत तुम्ही नाही, तर आम्ही सरस आहोत. कर्नाटकच्या राजधानीने आता महाराष्ट्राच्या राजधानीला मागे टाकलेय.मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात झालेल्या सर्वेक्षणातून याठिकाणी ५४ बिबट्यांचे अस्तित्त्व नोंदवण्यात आले. मात्र, नुकतच बंगळुरूचा देखील बिबट्यांवरील सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार बंगळुरू येथे ८५ बिबट्यांची नोंद करण्यात आली. त्यामुळे बिबट्यांच्या आकडेवारीत बंगळुरूने राजधानी मुंबईला मागे टाकले आहे.

फेब्रुवारी ते जून २०२४ दरम्यान झालेल्या कॅमेरा-ट्रॅप सर्वेक्षणात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या भूप्रदेशात ५४ बिबट्यांचे अस्तित्व उघड झाले. महाराष्ट्र वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन सोसायटी इंडिया यांनी हे सर्वेक्षण केले होते. दरम्यान, आता बंगळुरू शहराचा बिबट सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे. कॅमेरा ट्रॅपचा वापर करुन या शहराच्या सभोवतालचा वर्षभर अभ्यास करण्यात आला. यावेळी शहर परिसरात ८५ बिबट्यांची नोंद करण्यात आली. संजय गुब्बी आणि त्यांच्या होलेमत्ती नेचर फाउंडेशनच्या संशोधकाच्या पथकाने कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे सर्वेक्षण केले. तसेच त्यांच्या वर्तनाचा देखील अभ्यास केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरहल्ली, तुरहल्ली गुड्डा, बीएम कावल, यूएम कावल, रोएरिच इस्टेट, गोल्लाहल्ली गुड्डा, सुलिकेरे, हेसराघट्टा, मरासंद्रा, मांडुरू आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील एकूण २८२ चौरस किलोमीटर मिश्र अधिवासात २५० कॅमेरे वापरून संशोधकांनी ८५ बिबट्यांचे दस्तऐवजीकरण केले. यापैकी ५४ बिबट बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात नोंदवण्यात आले. तर उर्वरित ३० पेक्षा अधिक बिबट्यांची संख्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व बंगळुरूमधील जंगली भागात नोंदवण्यात आली. दक्षिण बंगळुरूमध्ये जंगलाच्या अबाधित भागांमुळे बिबट्यांची घनता जास्त आहे, असे या सर्वेक्षण अहवालात निदर्शनास आणून दिले. बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्यांची नोंद करणाऱ्या संशोधन पथकाला त्यांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. २०१९ मध्ये बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबट्यांची संख्या ४० च्या आसपास होती, ती २०२० मध्ये ४७ पर्यंत वाढली आणि आता २०२५ मध्ये ती ५४ वर पोहोचली आहे. ही वाढ मुख्यत्वे अधिवासाच्या प्रभावी संरक्षणामुळे झाली आहे. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी सरकारने विद्यमान नैसर्गिक अधिवासांचे, विशेषतः दक्षिण बंगळुरूमधील, संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असेही या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.