नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटानंतर त्या परिसरात असलेल्या बिबट्यासह इतर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या परिसरापासून कोका अभयारण्य २० ते २५ किलोमीटर दूर आहे. तर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि गोठणगाव गेट देखील १५ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, परिसरातील मानवनिर्मित जंगलात वन्यजीवांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या आयुध निर्माणीत भीषण स्फोट झाला आणि अवघा परिसर हादरला. या स्फोटाचे हादरे दूरदूरपर्यंत बसले आणि परिसरातल्या वस्त्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तब्बल चार किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज पोहोचला. त्यामुळे नागरिकही घाबरुन घराबाहेर पडले. यात काही माणसे मृत्युमुखी पडली, तर काही जखमी झाली. दरम्यान, या परिसरातच आयुध निर्माणी व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात झाडे लावली आणि एक मोठे जंगल याठिकाणी उभे झाले. अभयारण्य देखील फिके पडेल असे जंगल आयुध निर्माणी परिसरात तयार झाले. या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असायचा, पण या मानवनिर्मित जंगलामुळे वन्यप्राण्यांची संख्या वाढली. या परिसरात मोठ्या संख्येत वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत येणाऱ्या अनुसूची एकमधील (शेड्युल वन) बिबट, काळवीट, मोर आहेत. रानडुक्कर, निलगायसह इतरही अनेक वन्यप्राणी याठिकाणी मोठ्या संख्येत आहेत. ‘मिनी सँच्युरी’ म्हणता येईल, असे हे जंगल आहे. या स्फोटात वन्यप्राण्यांना काही इजा पोहोचली का, हे अजूनतरी बाहेर आलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर येथील वनसंपदेवर त्याचा परिणाम होणार असल्याचे मत वन्यजीव आणि पर्यावरण अभ्यासक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या दूरपर्यंत स्फोटाचे आवाज, धुराचे लोट पोहोचले ते पाहता त्यातील रसायन हे या जंगलावर उडाल्याने कायमस्वरुपी त्याचे दुष्परिणाम समोर येणार आहेत. स्थानिक वन्यजीव अभ्यासकांच्या मते अभयारण्यांपेक्षाही चांगले मानवनिर्मित जंगल या आयुध निर्माणीत तयार करण्यात आले. असंख्य प्रकारचे पक्षी, प्राण्यांचा तो अधिवास होता. कित्येकदा आयुध निर्माणीतील कामगारांचा बिबट्यांचे दर्शन होत होते. दरम्यान, कोका अभयारण्य या स्फोटाच्या ठिकाणापासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहे. तर उमरेड-कऱ्हांडला देखील सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या अभयारण्यावर आणि त्यातला प्राण्यांवर स्फोटाचा परिणाम होणार नाही. मात्र, आयुध निर्माणीने तयार केलेल्या स्वत:च्या जंगलातील वन्यप्राणी धोक्यात येऊ शकतात, अशी भीती स्थानिक वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.