अमरावती : भाजपमध्ये शिफारशींच्या माध्यमातून उमेदवारी दिली जात नाही. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत जो कार्यकर्ता पक्षाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबवेल, ५१ टक्क्यांच्या वर मते मिळण्याची पात्रता ठेवेल, त्यालाच तिकीट मिळेल. उगाच पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षाच्या मागे फिरू नका, नाहीतर तिकीटच कापले जाईल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
येथील परिणय बंध सभागृहात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, माजी आमदार प्रवीण पोटे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावती जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता या ठिकाणी दोन जिल्हाध्यक्ष आणि एका शहराध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या कुणाच्या सांगण्यावरून झालेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी माघार घेऊन पक्षादेशाचे पालन करणाऱ्या, पक्षासाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान करीत त्यांना अध्यक्षपद बहाल केले आहे. मेळघाटमध्ये प्रभुदास भिलावेकर यांची उमेदवारी पक्की असताना केवलराम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी प्रभुदास भिलावेकर यांनी माघार घेतली. तिवसामधून रविराज देशमुख यांनी माघार घेतली. या दोघांनाही जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे.
डॉ. नितीन धांडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत निवडून येणार नाही, हे लक्षात आल्यानंतरही शिक्षक मतदारसंघातून भाजपची उमेदवारी स्वीकारली. ते लढले. त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता पक्षाचे कार्यक्रम योग्यरीत्या राबविण्याचे आव्हान या अध्यक्षांसमोर आहे. पक्षाने एकूण ११ कार्यक्रम दिले आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे. अध्यक्षाने लीडरसारखे वागता कामा नये, तर कार्यकर्त्यासारखे वागले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
प्रवीण पोटे यांना सल्ला
माजी आमदार प्रवीण पोटे यांना शहराध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी नाकारली गेली, त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवीण पोटे यांना कार्यमग्न होण्याचा सल्ला दिला. बावनकुळे म्हणाले, नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. पण सतत कार्यरत असतात. कधी हनुमान चालिसा म्हणतात, तर कधी काँग्रेसच्या नेत्यांचा कार्यक्रम करतात. त्या शांत बसत नाहीत. प्रवीण पोटे यांनीही शांत बसू नये. राजकीय कार्यकर्त्यांनी शांत बसता कामा नये. आगामी महापालिका निवडणुकीत सर्व नेत्यांनी एकत्र बसून व्यूहनीती आखावी.