बुलढाणा : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उपोषणस्थळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज हजेरी लावली.
या सरकारला शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सगळ्या संघटना संपवायच्या आहे. त्यामुळे शेतकरी संघटना टिकवून ठेवणे ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.
बच्चू कडू यांच्या प्राणांतिक उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आज बुधवारी, ११ जून रोजी दुपारीक्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. तसेच सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी केलीच पाहिजे, त्यासाठी बच्चू कडू यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढू, असे तुपकर म्हणाले.
तुपकर म्हणाले, सरकारला शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सगळ्या संघटना संपवायचा आहे, संघटना टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. बच्चू कडू यांच्या सोबत शेतकरी राहिला तर निश्चितच कर्जमुक्ती होऊ शकते. ‘जो कर्जमुक्ती की बात करेगा वही झेडपी पें राज करेगा’ हा नारा लावणे गरजेचे. पैशात मते विकत घेणे, ही पद्धत मोडावी लागणार आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन हे जातीपातीचे आंदोलन नाही. आपल्या आंदोलनासाठी आपणच सेलिब्रिटी असून आपल्याला आता पुढे यावे लागणार आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहते त्या त्या वेळी जातीयवादी गिधाडे पुढे येतात. हे आंदोलन मोठे करून सरकारकडून कर्ज मुक्ती करून घेऊ, असे रविकांत तुपकर म्हणाले.