चंद्रपूर : जिल्ह्यातील तांदूळ घोटाळ्याची पाळेमुळे परराज्यात पसरल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून त्याची इतर राज्यात विक्री केली जात आहे, तर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील निकृष्ट व हलक्या प्रतीचा तांदूळ आयात करून शासनाच्या माथी मारला जात आहे. हाच निकृष्ट तांदूळ पुढे स्वस्त धान्य दुकानांना पुरवला जात आहे. अधिकारी आणि गिरणीधारकांच्या हातमिळवणीतून हा प्रकार सर्रास सुरू आहे.
जिल्ह्यात २०२४ या वर्षात ५ लाख ८९ हजार ४५५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यासाठी १२८ कोटी ६७ लाख ८० हजार रुपये राज्य शासनाने दिले. जवळपास ६५ हजार ७४७ शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. त्या शेतकऱ्यांकडून आधारभूत धान खरेदी योजनेतंर्गत धान खरेदी करण्यात आला. २०२५ मध्ये ४ लाख ४८ हजार २०९ क्विंटल धानाची खरेदी झाली. यासाठी १०३ कोटी ८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर झाला होता. त्यापैकी १०१ कोटी ९९ लाख १६ हजार रुपयांचेच धान खरेदी करण्यात आले.
राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्चून धान खरेदी करीत असते. याद्वारे गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून उच्चप्रतिचा तांदूळ मिळावा, हा यामागील उद्देश. मात्र, ही योजना राबवणाऱ्या यंत्रणेत सहभागी गिरणी धारक आणि काही अधिकारी या उद्देशालाच हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तयार झालेल्या तांदळाची परराज्यात विक्री केली जात आहे. तर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील निकृष्ट दर्जाचा, चवहीन तांदूळ आयात करून तो स्वस्त धान्य दुकानांमार्फत येथील नागरिकांच्या माथी मारल्या जात आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेला तांदूळ निकृष्ठ दर्जाचा असल्याने नागरिकही तो काळ्या बाजारात विकून मोकळे होत आहेत.
तांदळाचा हा काळाबाजार गेल्या काही वर्षांपासून चांगलाच फोफावला आहे. आधारभूत धान खरेदी योजनेतंर्गत शासनाने खरेदी केलेल्या धानाची गिरणी धारकांनी केलेली उचल व त्यानंतर धानाची भरडाई केल्यानंतर शासनाला पुरवठा होत असलेल्या तांदळाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर फेरफार करून शासनाची फसवणूक केल्या जात आहे.
छापासत्रामुळे फुटले बिंग
याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या समितीने नागभीड येथील चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रिज व गुप्ता राईस एक्सपोर्ट या दोन गिरण्यांवर छापा मारला होता. या तपासणीत उचल केलेले धान्य व प्रत्यक्षात भरडाई झालेला तांदूळ साठा याथ मोठी तफावत आढळून आल्याने सदर तांदूळ घेण्यास समितीने बंदी घातली आहे. या छापासत्राने तांदूळ घोटाळ्याचे बिंग फुटले. काही अधिकारी व गिरणी धारकांच्या हातमिळवणीतून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा तांदूळ घोटाळा केला जात असल्याचे यावरून समोर आले आहे.
धान गिरणीधारकांच्या चौकशीची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ धान गिरणीधारकांना धान भरडाईचे कार्यादेश जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून दिले जातात. त्यानंतर धान गिरणीधारक उचल केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ पुरवठा करीत असतात. मात्र हा तांदूळ प्रत्यक्षात उचल केलेल्या धानाचाच असतो का, याची खात्री कोणीही करीत नसल्याने धान गिरणीधारकांचे चांगलेच फावते. तेलंगणा, आंध्रप्रदेशातून कमी किंमतीचा आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणून गिरणीधारक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. यामुळे धान गिरणीधारकांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.