चंद्रपूर : जगात १४ देशांत वाघ असून त्यापैकी ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत आणि जगातील सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपुरात आहेत. ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठवण्यात आले. तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकारची परवानगी मागितली आहे. येथे येणारा देश-विदेशातील पर्यटक आनंद, ज्ञान, ऊर्जा, उत्साह घेऊन जाईल. पण, आपल्या चुकीच्या आचरणाने ताडोबाच्या नावाचा अपप्रचार होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. येथे मिळालेली सन्मानाची वागणूक पर्यटकाला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे, असे आचरण ठेवून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची मने जिंकावी, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मोहर्ली येथे निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान येथील वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदी उपस्थित होते. मोहर्ली येथे ७.४२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पर्यटन गेटच्या कामाचे भूमिपूजन झाले.

हेही वाचा : ‘चंद्रभागे’च्या काठावर सापडली, कष्टाने बारावी झाली, नोकरीही लागली अन पुन्हा मृत्यूच्या..!

भूमिपूजनानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाघाप्रमाणेच वाघासारखी माणसेसुद्धा जगली पाहिजे, मानवी जीवन अनमोल आहे. उपजीविकेसाठी जे जंगलात जातात, त्यांच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाययोजना म्हणून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून आपण गावांना निधी उपलब्ध करून देत आहोत. वन विभाग हा केवळ एक शासकीय विभाग नसून तो एक परिवार आहे. ताडोबाचे नाव जगात अधिक चांगले होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करावे. जीवनाच्या पहिल्या श्वासापासून शुद्ध ऑक्सिजन हे चांगल्या पर्यावरणामुळेच मिळते तर मनुष्याच्या शेवटच्या प्रवासातही अग्नी देण्यासाठी लाकडाचाच वापर होतो, असेही वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी अतिशय मेहनत घेऊन माया वाघीण आणि तिच्या बछड्यांवर आधारित आई-मुलाचे प्रेम दर्शवणारी सुंदर शॉर्टफिल्म तयार केली आहे. मुथ्थू यांनी ताडोबावर आधारित दर्जेदार ३०-३५ मिनिटांची आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखवण्यात येईल. तसेच वाघांची माहिती देणाऱ्या केंद्रासोबतच मोहर्ली येथे सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे. जेणेकरून वाघांप्रमाणेच येथील थिएटर प्रसिद्ध झाले पाहिजे. तत्पूर्वी वनमंत्र्यांच्या हस्ते मराठी व्याघ्रगीताचे अनावरण करण्यात आले. तसेच माया वाघिणीवर आधारित चित्रफीतचेही यावेळी लोकार्पण झाले. प्रास्ताविक क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी मानले.

हेही वाचा : लोकजागर: स्वप्नांचे ‘शोषण’!

मोहर्ली गाव पर्यटकीय सेवा केंद्र होणार

ताडोबाचे मुख्य आकर्षण असलेल्या मोहर्ली गावात सर्वंकष सुंदरता आणण्यासाठी आराखडा तयार केला जाईल. मोहर्ली गावासाठीसुद्धा आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येईल. गावात पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्टच्या माध्यमातून गावातील भिंती रंगवणे, आकर्षक मूर्ती लावणे आदी बाबींमधून पर्यटकीय सेवा केंद्र म्हणून मोहर्ली नावारूपास येईल.

हेही वाचा : खळबळजनक! तत्कालीन बीडीओंसह तीन कर्मचारी निलंबित; रिसोड पंचायत समितीत साहित्य खरेदी प्रकरण

राज्यातील तीन व्याघ्र प्रकल्पाला उत्तम दर्जा

देशातील सहा व्याघ्र प्रकल्पांना उत्तम मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सहापैकी तीन व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील आहे. वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच गावकऱ्यांनीसुद्धा जंगलांचे संवर्धन, संरक्षण केले आहे आणि त्रासही सहन केल्याचे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले.