लोकसत्ता टीम

नागपूर: प्रथम नेता निवडीला उशीर, नंतर मंत्रीपद वाटपाचा घोळ, मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यावर खातेवाटपाला विलंब आणि आता खातेवाटप झाल्यावर पालकमंत्री ठरवण्यावरून वाद अशी महायुती सरकारची आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे. अशात दोन दिवसात पालकमंत्री वाटपाचा घोळ संपणार असे संकेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे दिली होती. घटक पक्षांशी चर्चा करून पालकमंत्री ठरवावे, असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यालाही दोन आठवडे झाले. मात्र अद्याप नागपूरसह एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. यावरून या मुद्यावरून महायुतीत वाद आहे असे स्पष्ट होते.या पार्श्वभूमीवर सोमवारी बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, १५ ,१६ तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री अजित दादा एकनाथ शिंदे आमच्या दोन-तीन बैठकी झाल्या आहे. पालकमंत्री पदाचे वाटप अंतिम टप्प्यात आहे, असे बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…

राऊत यांनी विकासावर बोलावे

संजय राऊत दिवसभर वटवट करत असतात ते पराभवाच्या मानसिकतेत आहे. अंधारात दिवा घेऊन फिरत आहे. आता त्यांचा वेळ संपला आहे महाराष्ट्राची गद्दारी केली पुढच्या काळात त्यांना भविष्य नाही रोज सामनातून टीका करण्यापेक्षा पक्ष वाढवा.

जुन्या गोष्टी काढून आता राजकारण करता येणार नाही. आता नवीन काळ सुरू झाला आहे. संजय राऊत यांना विकासासाठी जर रोज सकाळी काही सुचवायचा असेल त्यांनी विकासावर बोलावं. रोजचे टोमणे बंद झाले पाहिजे. विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासाला साथ द्यावी आम्ही त्यावर काम करू, असे बावनकुळे म्हणाले.

मुंडेवर कारवाईबाबत कोणीच बोलले नाही

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल. धनंजय मुंडे दोषी असेल तर सरकार कारवाई करेल. जनतेने तपासात मदत करावी. मुंडेवर कारवाई व्हावी असं कोणीच खाजगीत मला बोलला नाही, असे बावनकुळे म्हणाले.१४ तारखेला मी सुरेश धस यांच्याशी बोलून चर्चा करणार आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहील, कोणावर कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी लाभ घेतल असेल तर तो बंद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे…

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल, पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यासोबत जाऊन काम करू, भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष आहे .पण आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाऊ, असे बावनकुळे म्हणाले.

शक्तीपीठ महामार्ग

शक्तिपीठ संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले आहे ते प्रश्न सोडून आम्ही पुढे जाऊ. शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल मनात शंका असेल शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावरच पुढे पाऊल टाकू शेतकरी समर्थन करेल त्या पद्धतीने आम्ही काम करू,असा दावा त्यांनी केला. कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून ऊर्जा मिळते, जनता आशीर्वाद देते. त्यासाठी विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी शुभेच्छा मिळतात.

Story img Loader