नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी मंत्रीमंडळात असावे म्हणून आग्रही होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे, असे राज्याच्या मंत्रिमंडळात अलिकडे समावेश झालेले छगन भुजबळ म्हणाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपुरात आले. यावेळी विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिक्त होती. त्यावर भुजबळ यांची वर्णी लागली आहे. परंतु त्यांच्या मंत्रिपदाबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यासंदर्भात ते म्हणाले, मी भाजपचा नव्हेतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री आहे. राज्यात सरकार स्थापनेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आमच्या पक्षाचा निर्णय झाला आणि मी मंत्री झालो नाही. आता आमच्या पक्षाने मला मंत्री करण्याचा निर्णय घेतला आणि मी मंत्री झालो आहे.

विरोधी पक्ष डागाळलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात सामील करण्यात आल्याची टीका करीत आहे. त्याबाबत ते म्हणाले, मी टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, मी न्यायालयाच्या आदेशानुसार निर्दोष आहे. आता पुन्हा पुन्हा जुन्या प्रकरणाचे संदर्भ देत बदनाम करणे योग्य नाही, मी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालायने ८० पानांचा निकाल दिला. त्यात मला आणि इतर संबंधितांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. तेव्हा त्या प्रकरणावरून टीका करणे योग्य नाही. महाराष्ट्र सदन बांधून तयार आहे. परंतु राज्य सरकारने त्याच्या कंत्राटदाराला अद्याप निधी दिलेला नाही, याकडे लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, मी सरकारमध्ये असो वा नसो. ओबीसी समाजाच्या प्रश्नावर कायम लढा देत राहणार आहे. मंत्रीपदावर राहिल्यास तो लढा अधिक प्रभावीपणे लढता येतो. पण, मी मंत्री केवळ ओबीसींचा नाही. राज्यातील संपूर्ण जनतेचा आहे, असेही ते म्हणाले.