नागपूर : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १४ मे २०२५ रोजी भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांनी या सर्वोच्च पदाची शपथ घेतली. ते सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारे पहिले अनुसूचित जातीतील न्यायमूर्ती आहेत. गवई यांचा कार्यकाळ तुलनात्मकदृष्ट्या अल्प असून, ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. परंतु या सहा महिन्यांच्या कार्यकाळातही त्यांच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेत कार्यक्षम नेतृत्व अपेक्षित करण्यात आहे.
न्या.गवईंनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यावर आठवड्याभरात सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी अवकाशाला सुरूवात झाली. सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यावर न्या.गवई सातत्याने दौरे करत आहे. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात न्या.गवईंनी लंडनचा दौरा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संविधानाचे महत्व यावर भाष्य केले. गवई यांनी १४ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ काही आठवड्यांतच न्यायव्यवस्थेच्या इतिहासात मोलाची आणि मूलगामी सुधारणा घडवून आणल्या आहेत.
न्यायालयीन कार्यक्षमतेपासून ते पर्यावरणसंवर्धनापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी झपाट्याने निर्णय घेत न्यायसंस्थेला नवे वळण दिले आहे. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी प्रोटोकॉल पालन न केल्यामुळे मुख्य सचिवांसह अधिकाऱ्यांना ख़डसावले होते. अमरावती, नागपूर, छत्रपतीसंभाजीनगर, मुंबई मध्ये आयोजित कार्यक्रमात न्या.गवई यांनी विविध सत्कार सोहळ्यात सहभाग घेतला. अलिकडेच हैदराबादमध्ये एका विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यात त्यांनी न्यायव्यवस्थेत बदल करण्याबाबत मत व्यक्त केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती आहे.
दिल्लीच्या रुग्णालयात भरती
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर हैदराबाद, मुंबई, नागपूर, लंडन व इटली आदी ठिकाणी दौरे करून विविध मंचांवर संविधान, न्यायव्यवस्था आणि सामाजिक न्याय यावर भाष्य केले. त्यांनी हैदराबादमध्ये न्यायप्रणालीतील प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला, तर मुंबई विधानमंडळात भावनिक भाषण करत तीनही राज्यघटकांमध्ये परस्पर आदराची गरज व्यक्त केली. नागपूरमध्ये कायदा शिक्षणावर बोलताना त्यांनी न्यायिक नेतृत्वाचे महत्त्व सांगितले. लंडनमध्ये त्यांनी संविधानामुळे अस्पृश्यतेतून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचे सांगून संविधानाचा गौरव केला. इटलीत त्यांनी भारतीय संविधानाला “शांत क्रांती” असे म्हणत सामाजिक न्यायाच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले.
शपथ घेतल्यापासून सातत्याने दौरे करत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला. हैदराबादमधून परतल्यावर त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते त्याला प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे. रुग्णालयात असल्यामुळे न्या.गवई सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईत सोमवारी सहभागी होऊ शकले नाही. येत्या दोन-तीन दिवसात ते पुन्हा कामावर रूजू होण्याची शक्यता आहे.