नागपूर : ‘बांटना और काटना’ हे भाजपचे काम आहे. महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी येथे केला.

राज्यातील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा दिल्या. त्यावरून खरगे यांनी भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, भाजपचे नेते विखारी भाषण देत मूळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. भाजपने विकासकामे सांगून थेट मत मागावे. देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपच्या कोणी बलिदान दिले ते सांगा, असे आव्हानही खरगे यांनी भाजपला दिले. महाराष्ट्र पूर्वी कायदा सुवस्था आणि न्यायव्यवस्थेसाठी ओळखले जाणारे राज्य होते. आता अतिशय वाईट स्थिती आहे. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी चांगले सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे, असेही खरगे म्हणाले.

हेही वाचा >>>पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका

पंतप्रधान गृहराज्यात प्रकल्प पळवतात

पंतप्रधान देशाचे असतात. विविध राज्यांना औद्याोगिक प्रकल्प, विकास प्रकल्प देण्याचे काम पंतप्रधानांचे असते. परंतु मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून नेतात. नागपूर शहरात दोन मोठे नेते आहेत. पण, त्यांचा प्रभाव मोदींसमोर टिकत नाही. नागपूरला येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत आहेत. पण, हे दोन्ही नेते गप्प बसले असा आरोप खरगेंनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींकडून कोविंद यांना लाल रंगाचे संविधान भेट

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या संविधानाची प्रत भेट दिली होती. त्यासंदर्भातील छायाचित्र खरगे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.