भाजपचे वरिष्ठ नेते व जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर पुलवामा घटनेबाबत व संघाचे राम माधव यांच्यावर ३०० कोटींच्या प्रस्तावाबाबत केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे सत्य लोकांना सांगावे, अशी मागणी करीत शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला.पुलवामामध्ये २०१९ मध्ये ४० जवानांचे प्राण गेले. त्यात सरकारची चूक होती हे सत्यपाल मलिक यांनी निदर्शनास आणून दिले असता केंद्रातील मोदी सरकारने त्यांना गप्प राहण्यास सांगितले. जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली ? सर्वात महत्त्वाचे या घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर.डी.एक्स. कुठून आले? असे अनेक प्रश्न सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर निर्माण झाले आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान भाजप व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले का, या सर्व प्रश्नांचे उत्तर जनतेला मिळायला हवेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन सरचिटणीस राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांच्या लाचेचा प्रस्ताव दिला होता, हा आरोपही गंभीर आहे. या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारने जनतेला द्यावे, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले.या आंदोलनात प्रामुख्याने प्रदेश काँग्रेसचे समाज माध्यम शाखेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रदेश उद्योग व वाणिज्य सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव प्रशांत धवड, माजी नगरसेवक रमन पैगवार, शहर महिला अध्यक्षा नॅश अली, प्रा. दिनेश बानाबाकोडे यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.