नागपूर : मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत असणाऱ्या कोमोडीन भागात दाखल झाला, पण अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. ते तयार झाले तर संपूर्ण कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पाच जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि कमी दाबाचे क्षेत्र वाढत जाऊन सात जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. स्कायमॅट या खाजगी हवामान संस्थेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. तर ॲक्युवेदरच्या हवाआन अभ्यासकांच्या मते अरबी समुद्राचे तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. ते कोणत्या तारखेला येईल याविषयी निश्चित काही सांगता येणार नसले तरीही या चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका आहे.
केरळ किंवा मालदीवच्या आसपास तयार होणारी चक्रीवादळे उत्तरेकडे सरकतात, पण बरेचदा अरबी समुद्रात तयार होणारे हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे जाण्याची शक्यता असते. बरेचदा ही चक्रीवादळै समुद्रात तयार होऊन समुद्रातच विरुन जातात. मात्र, त्याचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरात मध्ये होण्याची शक्यता असते. यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आणि मुंबईमध्ये जोरदार अतिवृष्टी होऊ शकते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर वादळ कोणत्या दिशेने सरकणार हे निश्चित होईल, असेही हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.