नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाने गेले वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेतले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आयोजित सर्व कार्यक्रमांचा अहवाल पंचायत समितीने दररोज सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिल्याने तालुका पातळीवर अधिकारी धास्तावले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत गेले वर्षभर विविध कार्यक्रम सुरू आहेत. या अनुषंगाने देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत ‘मातीस नमन, वीरांस वंदन’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायत व तालुका स्तरावर ग्रामसभा, पंचप्राण प्रतिज्ञा, शिलाफलक व वीरांना वंदन असे विविध कार्यक्रम आठवडाभर राबविण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टला ध्वजारोहरणानंतर प्रत्येक गावातील मूठभर माती सन्मानाने गोळा करून दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे. या अनुषंगाने केंद्राच्या कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची २२ जुलै रोजी दरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यात हे कार्यक्रम राबविण्याचा आराखडा सादर करण्यात आला.

आणखी वाचा-काय म्हणता मटणापेक्षाही महाग? होय, श्रावणात मशरूमला १२०० रुपये किलोचा दर

त्यानुसार, प्रत्येक ग्रामपंचायतीत ९ व १० ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात गावातील विशिष्ट ठिकाणी ‘शिलाफलक’ उभारणी करून स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिजन २०४७ हा संदेश व स्थानिक शहीद वीरांचे नाव असणार आहे. गावात ७५ देशी वृक्षांची लागवड करून ‘वसुधा वंदन’ करण्यात येणार आहे. यावेळी सर्व गावकऱ्यांनी ‘पंचप्राण’ प्रतिज्ञा घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रतिज्ञेचा नमूनाही सर्व ग्रामपंचयातींना पाठविण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणानंतर गावातील मुठभर माती सुशोभित कलशात गोळा करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातील गावांमधील माती गोळा करून दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद मोदींच्या उपस्थितीत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ सोहळा होणार आहे. त्यासाठी मातीचा हा कलश नेहरू युवा केंद्राच्या एका युवकासोबत सन्मानाने दिल्ली येथील कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींना सक्तीच्या रजेवर पाठवणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालुका स्तरावरही या कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांचे छायायित्रे, सेल्फी आणि अहवाल दररोज शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटीने मात्र तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कमी कालावधीत सर्व उपक्रम पार पाडायचे असल्याने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान गांभीर्याने राबविण्याऐवजी उरकून टाकण्यावरच अधिक भर राहण्याची भीती व्यक्त होत आहे.