लोकसत्ता टीम

यवतमाळ: जिल्ह्यातील अवकाळी वातावरणाचा गारवा संपुष्टात आला असून सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून कमाल तापमान ४४ अंशापर्यंत गेले आहे. तापमानाचा प्रकोप बघता प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.

मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील १० दिवस तापमानात आणखी वाढ होऊन ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १० दिवस उन्हापासून जपून राहण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. या काळात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… “नफरतखोर चीत, भाईचारे की हुई जित” कर्नाटक विजय अन् ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेला आनंद फलकावर

तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडणे टाळवे. थोड्या- थोड्या अंतराने पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, घराबाहेर पडताना टोपी, गमछा, दुपट्टा डोके व तोंड झाकण्यासाठी वापरावा, छत्रीचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे, अशा लिखित सूचना देण्यात आल्या आहेत. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय, शिळे अन्न खाणे टाळवे. उन्हात काम करताना चेहरा व डोके पांढऱ्या कपड्याने झाकावे. चक्कर येत असल्यास व आजारी वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे जावे. तत्पूर्वी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा… नेट आणि बीएडचा पेपर एकाचवेळी; अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी संभ्रमात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. दिवसभर पुरेसे पाणी पीत राहतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकांना केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी व्यक्तीला थंड जागी ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे. पाळीव प्राण्यांनासुद्धा सावलीत ठेवून भरपूर पाणी प्यायला द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.