लोकसत्ता टीम

नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकेमुळे त्या पक्षाविषयी संशयाचे वातावरण असताना वंचितने ज्या पक्षाला समर्थन जाहीर केला, त्या पक्षाच्या प्रचारात संमती शिवाय प्रचारात सहभागी होऊ नये असे नवीन पत्र या पक्षाने काढल्याने संभ्रावस्था वाढली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत बरेच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. हे सुरू असतानाच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. सोबतच काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर येथे समर्थन जाहीर केले. याशिवाय आणखी पाच जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. याशिवाय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना समर्थन देण्याची घोषणा केली. नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे, कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला, रामटेकमध्ये अपक्ष उमेदवाराला, अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना समर्थन देण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे असे काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन देत असताना या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी नवीन पत्र काढले. त्या पत्राद्वारे पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना मित्रपक्षाच्या प्रचाराला सूचना मिळाल्याशिवाय जाऊ नये, असे बजावण्यात आले आहे.

आणखी वाचा-वृद्ध शेतकऱ्याने केली ईडी अन् ५० खोक्यांवर बोलण्याची ‘फर्माईश’; आदित्य ठाकरेंनी केले असे की…

वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्या मित्र पक्षांचे पदाधिकारी किंवा उमेदवार वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी संपर्क साधत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांनी प्रदेश कार्यालयातून पक्षाची सूचना प्राप्त झाल्याशिवाय मित्रपक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असे रेखा ठाकुर यांनी पत्राद्वारे पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.