नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग हा कायम वादाचा विषय राहिलेला आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. काहींकडून संघाचा स्वातंत्र्यलढ्यात कुठेही सहभाग नव्हता असाही आरोप केला जातो. तर संघ समर्थकांकडून याचे खंडन केले जाते. हाच धागा पकडत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी नागपूर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नवीन दावा केला आहे. ते म्हणाले, १९७१च्या युद्धात आपले सैनिक लढत असताना त्या ठिकाणापर्यंत त्यांना जेवण पोहचवणे, दारूगाेळ्याच्या पेट्या पोहचवण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी केले. हे काम पाहून एक ब्रिगेडियर प्रभावित झाले. त्यांनी एका १४ वर्षांच्या स्वयंसेवकाला बक्षीस देण्याचा हट्ट केला. त्यावेळी आमच्या स्वयंसेवकाने, बाजूला दिसणारा लाहोर द्या, अशी मागणी केली. स्वयंसेवक स्वत:साठी कधीही काही मागत नाहीत. कायम निरपेक्ष अपेक्षेने देशासाठी काम करतो.
ज्येष्ठ संघ स्वयंसेवक रामचंद्र देवतारे यांच्या ‘संघ जीवन- भाग १ व २’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते शुक्रवारी नागपुरात झाले. यावेळी ते बोलत होते. शिक्षक सहकारी बँक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नचिकेत प्रकाशनचे श्रीनिकेतन सांबरे, रामचंद्र देवतारे उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले अशी चर्चा आपल्याकडे सुरू असते. परंतु, खरे पाहिले तर ते कुणा एकामुळे मिळाले नाही. १८५७ पासून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा आगडोंब उसळला आणि ती आग कधीच शांत झाली नाही. ती प्रेरणा सतत कायम राहिली. यादरम्यान अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सरसंघचालक म्हणाले, संघाचे काम हे लाखो स्वयंसेवकांनी जीवन झिजवल्याने वाढते.
संघाची दिशा ही सामूहिक विचार मंथनातून ठरते. संघ जे बोलतो आणि करतो ते सामूहिक सहमतीतून असते. अनेकदा सज्जन माणसांच्या वाट्याला त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय येत नाही. तर, काही लोकांच्या भाग्यात थोडेफार केले तरी भरपूर असते. ज्यांच्या हयातीत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या खात्यात त्याचे श्रेय जाणार, यात काहीही वावगे नाही. मात्र, ज्यांचा यात वाटा नाही त्यांना श्रेय मिळाले तर अहंकार येतो. मिळालेले श्रेय पचवण्याइतकी क्षमता असेल तरच त्यांना ते श्रेय पचते, असेही सरसंघचालक म्हणाले.
संघाविषयी माहिती नसतानाही चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे बोलणारे लोक खूप आहेत. मात्र, असे बोलणाऱ्या लोकांनी आमचे काम पाहिल्यावर त्यांची भूमिका बदलते. त्यांना संघाकडून खूप शिकायला मिळाले, असे ते नंतर सांगतात. आपलेपणाचा परिघ वाढवत राहणे हेच स्वयंसेवकाचे काम आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. प्रास्ताविक देवतारे यांनी तर संचालन उल्हास इटनकर यांनी केले.