नागपूर: नागपूरचे डॉ. सुशांत देशमुख अहमदाबादच्या बी. जे. मेडिकल कॉलेज परिसरातल्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटशी संलग्न (जी.सी.आर.आय.) सुपर स्पेशालिटी विभागात कर्करोग शल्यक्रिया शाखेत पदव्युत्तच्या अंतीम वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताची माहिती देतांना सदर विमान थोडेही वळून रुग्णालयावर पडले असते तर काय अनर्थ झाला असता? त्याबाबत सांगितले आहे.

भ्रमनध्वनीवर नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधतांना डॉ. सुशांत देशमुख म्हणाले, विमान वसतिगृहावर आदळल्याने मृत्यू कमी झाले. विमान आणखी थोडे वळून रुग्णालयावर पडल्यास जास्तच अनर्थ झाला असता. या रुग्णालय परिसरातून रोजच अनेक विमाने उडताना आणि उतरताना दिसतात. ही नेहमीची बाब आहे. पण, त्या दुर्घटनेच्या दिवशी काही सेकंदांत सगळे बदलले आणि ते भयावह होते, असेही देशमुख यांनी सांगितले.

बारा जून रोजी एअर इंडियाच्या ड्रीमलाइन फ्लाइट एआय-१७१ ने अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजजवळील हॉस्टेल इमारतीवर धडक दिली, जिथे अनेक एमबीबीएस विद्यार्थी आणि कनिष्ठ डॉक्टर राहतात. घटनेच्या वेळी डॉ. सुशांत हे रुग्णालयातील ‘ओपीडी’ मध्ये रुग्णसेवा देत होते. परंतु, मोठा आवाज होऊन आगीचे ज्वाळ दिसताच आम्हाला धक्का बसला. आम्ही सर्व जण मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मदत करताना, मित्राचे नातेवाइक शोधताना सकाळ कधी झाली कळलेही नाही.

आमच्या होस्टेलमधील दोन विद्यार्थ्यांचे नातेवाईक अजूनही बेपत्ता आहेत. शेजारच्या आंतरवासितांच्या वसतिगृहात सुमारे ५० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील तीन जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. उरलेले थोड्याफार जखमांसह सुरक्षित आहेत. आमचे अतुल्यम होस्टेल, ते आगीत गडप झाले आहे. प्रशासनाने ते सील केले आहे. सध्या मी स्थानिक मित्रांकडे राहतोय. परिस्थिती हळूहळू सामान्य होते आहे. रुग्णालयातील कामकाजही पुन्हा सुरू होत असल्याचेही डॉ. देशमुख यांनी भ्रमनध्वनीवर सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सुशांतची आई डॉ. सुषमा देशमुख म्हणाल्या…

नागपुरातील सुप्रसिद्ध स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख या डॉ. सुशांत देशमुखची आई आहे. या घटनेवर डॉ. सुषमा देशमुख म्हणाल्या, माझा मुलगा सुरक्षित आहे; पण त्याचे मन त्याचे मित्र आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी व्याकूळ आहे. अपघातानंतर त्याने मला आणि त्याच्या वडिलांना कॉल केला. पण, आम्ही दोघेही त्या वेळी सर्जरीमध्ये होतो. नंतर जेव्हा आम्ही फोन केला, तेव्हा त्याने सांगितले की, तो सुरक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय वृत्त माध्यमांवर बातम्या सुरू झाल्याने घटनेची गंभीरता कळली.