नागपूर: उड्डाण पुलांचे शहर अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये या पुलांवरून धावणाऱ्या सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. सोमवारी सदर उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी सदर उड्डाण पुलावर एका सुसाट कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एकाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील उड्डाण पुलांवर वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार पुलाखाली पडून मृत्यू होण्याचे प्रकार यापूर्वीही विविध उड्डाण पुलांवर घडले आहेत. सदर पुलावर झालेला हा दुसरा अपघात होता. यापूर्वी बर्डी उड्डाण पूल आणि सक्करदरा उड्डाण पुलावरही वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार पुलाखाली पडले. सक्करदरा उड्डाण पुलावरून तर दुचाकीवर जाणारे कुटुंबच खाली पडून ठार झाले होते. सदरमधील सोमवारच्या घटनेने या सर्व घटनांच्या थराराक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. उड्डाण पुलावरून धावणारी सुसाट चारचाकी वाहने हेच या अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे.

हेही वाचा… नागपुरात हरवलेला तेलंगणातील रुग्ण दीड महिन्यांनी घरी; निराधार म्हणून मेडिकलमध्ये उपचार आणि…

सदरमधील वाहनकोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र त्याचा उद्देश यशस्वी झालेला दिसत नाही. पुलावरून धावणाऱ्या सुसाट वाहनांची संख्या वाढतच आहे. अशीच स्थिती वर्धा मार्गावरील अजनी ते सोनेगाव पोलीस ठाण्यापर्यंतच्या उड्डाण पुलाचीही आहे. येथे रात्री अत्यंत वेगाने चारचाकी वाहने धावतात. अनेकदा चालक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. बर्डी उड्डाण पुलावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी वाहनांची प्रचंड गर्दी असते. विशेषत: महाविद्यालयीन मुले, मुली, शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या अधिक असते. मात्र वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे कुठलीही उपाययोजना नाही. त्यामुळे उड्डाण पुलावरील दुचाकीस्वारांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला आहे, अशी प्रतिक्रिया नागपूरकर नागरिक व्यक्त करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानवी चुका कारणीभूत

रस्त्यावरील असो किंवा उड्डाण पुलावरील अपघात असो त्यात ९० टक्के मानवी चुका कारणीभूत असतात. सुसाट वाहने चालवणे, मद्यप्राशन करून वाहने चालावे व तत्सम कारणांमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यावर वाहतूक नियम पाळणे हाच पर्याय आहे. शहरातील विविध अपघात प्रवणस्थळी (ब्लॅकस्पॉट) लोकसहभागाच्या माध्यमातून आम्ही उपाययोजना करीत आहोत. – राजेश वाघ, अशासकीय सदस्य, रस्ता सुरक्षा परिषद.