नागपूर : कारागृहाच्या तटबंदी भींतीच्या आड शिक्षा भोगत असलेल्या आई, वडिल आणि आजोबाला भेटण्याची आतुरता. अनेक दिवसांनंतर आपल्या चिमुकल्याला प्रत्यक्षात बघण्याची ओढ. मुलांचे रुसवे, फुगवे आणि गोडवे गात कारागृहातील वातावरण कौटुंबिक आणि भावनिक झाले. प्रसंग होता कैद्यांच्या मुलांसाठी गळाभेट कार्यक्रमाचा. शनिवारी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील १०९ कैद्यांच्या १९७ मुला-मुलींनी गळाभेट घेतली.

शासनाच्या आदेशानुसार कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कुटुंबीयांशी ‘गळाभेट’ करण्याचा उपक्रम शनिवारी राबवण्यात आला. यासाठी कारागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बंदिवानांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांना भेटण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. कैद्यांमध्ये कारागृहात असताना नैराश्याची, गुन्हेगारी भावना येऊ नये म्हणून ‘गळाभेट’ या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बंदिवानांचे पुनर्वसन, सुधारणा हा त्या मागचा हेतू आहे. बंदी हा समाजापासून तुटू नये. तो समाजाशी जोडलेला असावा, तसेच मानवता,करुणा ही भावना हा कार्यक्रमाचा हेतू असल्याने नागपूर कारागृहात कैदी मोठ्या भावनिकरित्या गुंफलेल्या नात्यातून गुरफटले होते.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डायनोसॉर’चे जीवाश्म स्थळ नष्ट

अनेक कैद्यांना आप्तेष्ठांना, मुलांना, पत्नीला बघून डोळ्यात अश्रू आवरता येत नव्हते. शिक्षा कारागृहात भोगत असताना कारागृहातील महिला व पुरूष कैद्यांच्या मुलांना आपल्या मातापित्यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा असते. मातापिता त्यांच्यापासून दूर असल्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक पोकळी निर्माण झालेली असते. सर्वप्रथम काही मुले-मुली लाजत, संकोचत, घाबरत भेटीसाठी आली. परंतु, नंतर आनंदाने आपल्या वडीलांच्या, आजोबांच्या अंगाखांद्यावर मनोसक्तपणे खेळली. हा उपक्रम अधीक्षक वैभव आगे यांनी राबविला. कैद्यांच्या मुलांना चॉकलेट, बिस्किट आणि खाऊ वितरित करण्यात आला.

हेही वाचा…यवतमाळ : शासकीय जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका कैद्याच्या मुलाने ‘हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय’ हे शेतकरी गीत सादर केले. त्यामुळे गळाभेटीचे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. कैदी व पाल्य यांच्या गळाभेटीनंतर कारागृहातून परत जातांना पाणावलेल्या डोळ्यांनी मुलांनी आपल्या आई-वडिलांना डबडबलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. त्यामुळे भेटीप्रसंगांच्या या क्षणी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते.