नागपूर : जेव्हा जंगलात कडाक्याची थंडी पडते तेव्हा वानर लाकडे गोळा करुन शेकोटीसारखा ढीग रचतात. ती लाकडे पेटवत नाहीत, पण त्याभोवती बसून शेक घेतात. वानर निघून गेल्यावर ही शेकोटीसारखी रचलेली लाकडे पेटवण्याचा प्रयत्न केला, तर ती पेट घेत नाहीत. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी ही गोष्ट सांगितली. मात्र, अनेकांनी त्यांच्या या गोष्टीवर कडाडून टीका केली.

अरण्यऋषी जंगलात पायी फिरायचे, तिथल्या आदिवासींशी संवाद साधायचे, त्यांच्याकडूनच बऱ्याच गोष्टी त्यांनी माहिती करुन घेतल्या. हा प्रकार देखील त्यातलाच होता. ‘लोकसत्ता’त जेव्हा प्राणीविश्वावर आधारित लेख करायचे ठरवले, तेव्हा अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. वानरांनी रचलेल्या शेकोटीत अगदी रॉकेल टाकून ती पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ही लाकडे पेटली नाहीत. या प्रकाराबाबत त्यांनी आदिवासींना विचारले तेंव्हा आदिवासी त्यांना सांगितले की, थंडीत अंग शेकताना ही वानरे त्या लाकडातले अग्नितत्व काढून घेतात म्हणून ती पेटत नाहीत.

असाच त्यांनी उंदराच्या चोरीचा किस्सा देखील सांगितला. उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ भेटला, त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाड्यावर बोलावले. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटरपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होते. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवले होते. ही सर्व निरीक्षणे या अरण्यऋषींनी नोंदवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. हत्ती म्हातारा झाला की त्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असे कळप ठरवतो. अशावेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. या ऐकीव कथा नाहीत, तर प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास दौऱ्यांत चितमपल्ली यांनी हे अनुभवले.