लोकसत्ता टीम

बुलढाणा: ‘लोकसभे’पूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा करायची अन निवडणूक लागली तर तडजोड करून आपली जागा पदरात पाडून घ्यायची, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची नेहमीचीच भूमिका राहिली आहे. आताही त्यांनी तेच केले असून त्यात काहीच नवीन नाही, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर शरसंधान साधले.

मागील अनेक दिवसांपासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात निर्धार परिवर्तन यात्रा करीत असलेल्या तुपकरांनी प्रसिद्धी माध्यमासोबत संवाद साधला. यावेळी तुपकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. आपल्या पदयात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला, मिळतोय. अगदी सामान्य माणूस आर्थिक मदत करून मी निवडणूक लढवावी असा आग्रह धरत असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट आणि त्यांना हातकणांगले मतदारसंघात बाहेरून दिलेला पाठिंबा यावर विचारणा केली असता त्यांनी वरील शब्दात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. दर पंचवार्षिकमध्ये ते ( शेट्टी) हेच करतात. निवडणूक जवळ आली की स्वबळाची भाषा बोलतात आणि नंतर वाटाघाटी करून आपली जागा पदरात पाडून घेतात.

आणखी वाचा- निवडणुकीत पैशाचा गैरवापर, आयकर विभाग म्हणतो येथे संपर्क साधा

मात्र यामुळे अनेक महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे मरण होते. मागील दोन निवडणुकीत माझ्या सोबत हेच झाले. त्यामुळे आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. आम्हाला काय करायचे ते आम्ही ठरवले आहे. यंदाची लोकसभा मी ताकदीने लढविणार आणि जिंकणार असा दावा तुपकरांनी केला.