बुलढाणा : प्रतिकूल हवामान आणि अतिवृष्टीमुळे केदारनाथ येथे अडकून पडलेल्या पाच महाराष्ट्रीयन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, नाशिक आणि पुणे येथील एकूण ५ भाविकांचा समावेश आहे. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने गुप्त काशी येथे सुरक्षित पोहोचवण्यात आले आहे. यामुळे या पाच भाविकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

केंद्रीय आरोग्य, आयुष आणि परिवार कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर भाविकांनी केंद्रीय मंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहे.

राज्यातील नाशिक येथील धीरेंद्र वाघ, डॉ. पूनम रेंडीवार, पुणे येथील ज्योती घोगे नागपूर येथील राधिका अवस्थी व त्यांचे अन्य सहकारी केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. मात्र, १८ मे रोजी केदारनाथ येथे प्रतिकूल हवामान निर्माण झाले. अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच मार्ग, रस्ते बंद झाले. दरम्यान, या भाविकातील दोन महिला भाविकांची प्रकृती खराब झाली. काही जणांनी शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव,  प्राध्यापक डॉ. सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधून संकटाची माहिती दिली. तसेच मदतीसाठी साकडे घातले.

त्यानंतर केंद्रीयमंत्री जाधव यांच्या दिल्ली येथील जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने उत्तरांचलच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी (सीएमओ) संपर्क साधण्यात आला व त्यांना तत्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देशित करण्यात आले. त्यामुले उत्तरांचल  सरकार, प्रशासकीय यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन विभाग वेगाने सक्रिय झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिवृष्टीचे थैमान थांबल्यानंतर केदारनाथ येथे अडकून पडलेल्या या भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने खाली मुक्त काशी येथे सुरक्षितरित्या आणण्यात आले. या भाविकांच्या संपर्कात केंद्रीयमंत्र्यांचे दिल्ली येथील स्वीय सहाय्यक अचल भाटिया हे सातत्याने होते. संकटकाळात मिळालेल्या मदतीबद्दल या भाविकांनी केंद्रीयमंत्री व त्यांची चमू, उत्तरांचल सरकार, मुख्यमंत्री आणि आपत्ती विभागाचे आभार मानले आहे.