बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आणि लाखो रहिवासी यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार पावसाने हजेरी लावली. आज गुरुवारी प्रामुख्याने मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे या तालुक्यातील अनेक नदी, नाले एक झाले असून झालेल्या पेरण्यांचे नुकसान झाले आहे. तसेंच दैनंदिन जीवन, व्यवहार विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यात घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

 आज गुरुवारी सकाळी ८. ३० वाजता संपलेल्या गट २४ तासात तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  बुलढाणा तालुक्यात ७३ मिमी, चिखली मध्ये ७० तर लोणार तालुक्यात ८२  मिमी पावसाची नोंद झाली  सिंदखेड राजा तालुक्यात ५०मिमी तर देऊळगाव राजा तालुक्यात ३२मिमी पावसाची नोंद झाली. आज मेहकर व लोणार तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यातील पांगर खेड येथील घनश्याम सुर्वे यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली. यामुळे सुदैवाने १५ टिनपत्रे,आणि घरगुती साहित्याची हानी झाली. मेहकर आणि लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

शेतकऱ्यांनी नुकत्याच केल्या असलेल्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अधिकृत अंदाज अद्याप हाती आलेला नाही. मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात विशेषतः पावसाचा मोठा मारा झाला. गावालगतच्या नाल्याला पूर आला असून वरून आलेल्या पाण्यामुळे प्रसिद्ध शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.

या मार्गावर गेले दोन तासांपासून पूर्ण बंद झाल्यामुळे यात्रेकरूंना व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही समजते, त्यामुळे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातही जोरदार पावसाचा कहर सुरू असून रस्ते व शेतजमिनी जलमय झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मेहकर उपविभागातील बोरखेडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तलाव ७५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लवकरच सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पशुधन, शेतीची अवजारे आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.