नागपूर: निरामय मानसिकता ही सुखाची वाट तर तणावमुक्त जीवन हे सुखाचे जन्मस्थान आहे. मात्र, आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कुठलातरी ताण असतोच. हा ताण घालवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे व मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधक व मानसोपचार समुपदेशक यजुर्वेद नरहरी सेलोकर यांनी ‘एलईडी’ दिव्यांच्या निळ्या प्रकाशाचा शोध लावला आहे. दिव्यांच्या निळ्या प्रकाशाखाली बसून तणावमुक्त होता येणार आहे.

डॉ. ढोबळे व यजुर्वेद सेलोकर यांनी नैराश्य, चिंता व हंगामी आजारावर उपाययोजना शोधत निळ्या रंगाच्या प्रकाशापासून उपचार घेण्यासाठी ‘ब्ल्यू लाईट ल्युमडोम’ नावाचे मॉडेल तयार केले आहे. कमी तरंग असणाऱ्या निळ्या प्रकाश तत्त्वावर या मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. निळ्या रंगाच्या व कमी तीव्रतेच्या प्रकाशामध्ये २०-३० मिनिटे बसल्यानंतर तणाव, राग किंवा चिंता कमी होऊन चांगले वाटायला लागेल, असा संशोधकांचा दावा आहे. यासाठी काही दिवस नियमित उपचार घ्यावा लागणार आहे. यात शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. तसेच आपल्या जीवनात परिवर्तन दिसण्यास सुरुवात होईल, असे डॉ. ढोबळे व यजुर्वेद सेलोकर या दोन्ही संशोधकांचे म्हणणे आहे. ‘ब्ल्यू लाईट ल्युमडोम’ या मॉडलेला नुकतेच आंतरराष्ट्रीय ‘स्वामित्व हक्क’ मिळाले आहे. मानवासाठी ही उत्तम ‘लाईट थेरेपी’ आहे, असे संशोधकांनी सांगितले. औषधमुक्त, सुरक्षित, नैसर्गिक व कमी खर्चामध्ये कमी वेळेत ही ‘लाईट थेरेपी’ जनतेसाठी कुठेही उपलब्ध होऊ शकते, हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हॅपी हार्मोन्स’च्या निर्मितीस चालना

‘ब्ल्यू लाईट ल्युमडोम’ निर्मितीसाठी सहा निळ्या प्रकाशाची ४२५ ते ४८० एनएम या तरंगध्येयाचे पॅनल लाईट डोमच्यावर लावले गेले. जेणेकरून तो प्रकाश कमी तीव्रतेचा जाणवेल व डोळ्यावर सरळ येणार नाही. निळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये २५-३० मिनिटे बसल्यानंतर मेंदूतील ‘सेरोटोनिन’ आणि ‘डोपामिन’ यासारख्या ‘हॅपी हार्मोन्स’च्या निर्मितीस चालना मिळते. त्याचबरोबर झोपेचा दर्जा सुधारतो आणि नैराश्याची तीव्रता कमी होते. निळ्या रंगाच्या प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर शांततेची अनुभूती होते व या रंगामुळे शरीर मनावर सकारात्मक परिणाम होतो. निळ्या रंगाच्या प्रकाशात बसणाऱ्याची रागाची व नैराश्याची तीव्रता कमी होऊन स्व:ऊर्जेची निर्मिती होते, उत्तम प्रकारचे विचार येता. यजुर्वेद सेलूकर यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्य करून शांत जीवनासाठी हा उपाय शोधला आहे.