लोकसत्ता टीम

यवतमाळ : महागाव तालुक्यात डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिक घाबरले आहेत. तालुक्यात आठ दिवसांत डेंग्यूने तीन मृत्यू झाले. आज शनिवारी महागाव येथील एका व्यक्तीचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर मृतकांपैकी एक मृत हिवरा संगम आणि दोन डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.

डोंगरगाव येथील सुहाना सय्यद इरफान या १० वर्षीय मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. डोंगरगाव येथील शेख शायान शेख वाजाद या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हिवरा संगम येथील रितिक्षा ऊर्फ सुरेखा मुलीचा याच आजाराने मृत्यू झाला. डोंगरगाव येथे आठवडाभरात दोन मुलांचा मृत्यू झाला. हे मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील मुलं या आजाराचे बळी ठरू नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने तातडीने ठराव घेत गावातील शाळा १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने एवढा मोठा निर्णय घेतला असताना डोंगरगाव ग्रामपंचायत, तसेच महागाव पंचायत समितीची यंत्रणा मात्र गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

आणखी वाचा-भुजबळांना सल्ला देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले…?

डोंगरगाव हे ३ हजार ३०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील सुहाना शेख या मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेची विद्यार्थिनी होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने ५ ऑक्टोबर रोजी ठराव घेऊन २० ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता झाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंगरगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक सुरू आहे. घरोघर तापाचे रुग्ण असताना आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील डेंग्यू, मलेरिया इतर संक्रमण आटोक्यात येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे पालकांनी ठरवले आहे. गावातील सरपंच शिवाजी हातमोडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. येथील उपसरपंच सय्यद ऐसान यांना सरपंचपदाचा प्रभार देण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असताना जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह कोणीही तालुक्यात फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.