गडचिरोली : महाराष्ट्रातील सत्तारुढ सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपयशी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोली येथे केली. काँग्रेसतर्फे गुरुवारी येथे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली, त्यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

सपकाळ पुढे म्हणाले, मोदी आणि फडणवीस हे ‘कसाई’ असून, ते शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांच्या मानेवर सुरा फिरवत आहेत. मोदींनी आश्वासन देऊनही नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये दिले नाही. दारूचे भाव वाढवून पैसा उभारायचा, नवऱ्याला दारू पाजायची आणि पत्नीला लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायचे, असा गलिच्छ प्रकार सरकार करीत असल्याची टीका सपकाळ यांनी केली. मोदींच्या काळात ‘हम करें सो कायदा’ असे चित्र असून, विरोधात बोलणाऱ्यांना कारागृहात डांबले जात आहे. मोदी-फडणवीसांची जोडी सत्ताभोगी असून त्यांनी देशातील लोकशाही संपुष्टात आणली. महाराष्ट्रातील सत्तारुढ सरकार हे मतांची चोरी करून आलेले सरकार असून, हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसे देईल, असा सवाल सपकाळ यांनी केला.

काँग्रेसचे विधान सभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यासाठी सरकारवर ‘ओव्हरड्रॉफ्ट’ काढायची पाळी आली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, भाजप सरकारने शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतींचे १९ लाख कोटी रुपये माफ केले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

याप्रसंगी अ.भा. काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचीही भाषणे झाली. सभेचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते, तर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर यांनी आभार मानले. सभेनंतर अभिनव लॉन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय यात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार रामदास मसराम, आमदार अभिजीत वंजारी, पक्षनिरीक्षक सचिन नाईक, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी नगराध्यक्ष अॅड.राम मेश्राम, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, विश्वजित कोवासे, सतीश वारजूकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.