गडचिरोली : कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळील जंगल परिसरात पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत सतत पत्नीशी वाद घालणाऱ्या पतीने अखेर वैवाहिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (३४) असून आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (३४, रा. सोनपूर) असे आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला सुमारे दहा वर्षे झाली असून त्यांना दोन लहान मुले आहेत. मुलांचे वय अनुक्रमे नऊ व पाच वर्षे असून आईच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सावट आले आहे.
पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडखोर असून पत्नीच्या चारित्र्यावर तो वारंवार संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत. ३१ ऑगस्ट रोजीही दाम्पत्यात मोठा वाद झाला. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी पायी नेण्यास सुरुवात केली. मात्र सोनपूर-गोडगुलदरम्यानच्या कामेली जंगल परिसरात जात असताना पुन्हा वाद उफाळला. संतापाच्या भरात पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडले. तिच्या छातीवर बसून गळा दाबून तिचा खून केला.
पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी गावात परतला. यावेळी त्याने दारूच्या नशेत गावकऱ्यांसमोरच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मृतकाची आई चमरीबाई बोगा (रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड) यांना ३ सप्टेंबर रोजी मिळाली. त्यांनी तात्काळ कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस सोनपूर येथील शेतातून अटक केली.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. २०१७ साली कोटगुल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चोरी प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे त्याच्या आक्रमक प्रवृत्तीबद्दल ग्रामस्थांना पूर्वीपासूनच शंका होती. सध्या या प्रकरणाचा तपास कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलीस ठाण्याचे प्रभारी कृष्णा सोळुंके करत आहेत. या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ग्रामीण भागात कौटुंबिक कलहामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशय, दारूचे व्यसन आणि हिंसक स्वभाव यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय आहे. सोनपूर परिसरातील ही घटना त्याला अपवाद ठरली नाही. टामिनबाईच्या मृत्यूनंतर दोन निरागस मुले आधाराशिवाय झाली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या संशयी स्वभावामुळे एका निरपराध स्त्रीचे जीवन संपुष्टात आले, ही घटना समाजातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला पुन्हा अधोरेखित करते.