गडचिरोली : कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथे शेतातील धानाची गंजी झाकण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. २५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सरगम सोमनाथ कोरचा (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेत त्याचा नातेवाईक योगेश घावळे (वय १७) हा जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरगम कोरचा हा मसेली येथील छत्रपती विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. सध्या जिल्ह्यात सर्वत्र धान कापणीचा हंगाम सुरु असून, केसालडाबरी येथील त्याचे वडील सोमनाथ कोरचा यांच्या शेतातही धान कापणी सुरू होती. आज दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात उघड्यावर असलेली धानाची गंजी भिजू नये, म्हणून सरगम हा गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा येथून आलेल्या नातेवाईक योगेश घावळे याच्यासह गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेला. मात्र पाऊस सुरू झाल्याने दोघेही शेतातील एका मोहाच्या झाडाखाली आडोशासाठी थांबले. सरगमचे वडील सोमनाथ कोरचा हे त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभे होते. त्याचवेळी या मोहाच्या झाडावर वीज कोसळली. यात सरगम व योगेश दोघेही गंभीर जखमी होऊन खाली पडले.

सोमनाथ कोरचा यांनी तात्काळ आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले आणि दोघांनाही कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तथापि, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरगमला तपासून मृत घोषित केले. जखमी योगेश घावळे याच्यावर वैद्यकीय अधिकारी हितेश वंजारी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आकस्मिक घटनेमुळे केसालडाबरी व मसेली परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे. सरगमच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस

दुपारनंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची इत्यादी तालुक्यांमध्ये पाऊस पडल्याने, कापणीला आलेल्या व कापून ठेवलेल्या हलक्या धानाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.